मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर, ABVPचा शिंदेंवर निशाणा
मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांसाठी 22 सप्टेंबर रोजी होणारी सिनेट निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. खरे तर सिनेटच्या निवडणुकांना आधीच दोन वर्षांपेक्षा जास्त उशीर झाला आहे. प्रदीर्घ विलंबानंतर 22 सप्टेंबर रोजी 10 जागांवर 28 उमेदवार आपले नशीब आजमावणार होते, मात्र निवडणुकीच्या एक दिवस आधी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत यावर आता अभाविपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एक्स हँडलवर 'मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली विद्यापीठ प्रशासनाने शेवटच्या क्षणी निवडणूक प्रक्रिया तात्पुरत्या काळासाठी पुढे ढकलणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे',असे लिहिले आहे. अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री संकल्प फलदेसाई यांनी निवडणूक रद्द करण्याबाबत म्हटले की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात सातत्याने अपयशी ठरलेल्या विद्यापीठाचा हा निर्णय पदवीधरांचा अपमान आहे.

रद्द करण्याचे कारण स्पष्ट नाही
मुंबई विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. मात्र, निवडणुका का रद्द झाल्या याबाबत विद्यापीठाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सिनेट निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होत आहे. तर या निवडणुकीच्या मैदानात मनसेही उतरली आहे.
शिवसेनेला 10 पैकी 10 जागा जिंकण्याची खात्री
विद्यापीठाने सिनेट निवडणूक पुढे ढकलल्याबाबत शिवसेनेचे ( उबाठा) नेते वरुण सरदेसाई म्हणाले की, निवडणुकीच्या एक दिवस आधी सिनेटची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. युवासेना 10 पैकी 10 जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला. याची सरकारला भिती आहे. वरुण सरदेसाई पुढे म्हणाले की, मागच्या वर्षीही असाच प्रकार करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सुरुवातीपासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदारांची नोंदणी झाली. निवडणुका घेण्याबाबत माहिती देण्यात आली, मात्र पुन्हा एकदा ते घाबरले आहेत.
अमित ठाकरे यांचीही टीका
नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले की, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केलं आहे. ही काही पहिली वेळ नाही. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळं मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय? असा प्रश्न सर्वांना पडला असल्याचे मत अमित ठाकरे यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे.












Click it and Unblock the Notifications