मुंबईकरांनो जरा जपून! लोकल अपघातातील मृतांचा आकडा भयावह, 3 वर्षात 7500 हजारांवर प्रवाशांचा गेला जीव
Mumbai Local Train : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे लोकल, मुंबईचा श्वास लोकल आहे आणि लोकल ट्रेनवर मुंबईची मोठी अर्थव्यवस्था आहे, पण लोकलखाली येऊन, रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्यांचा आकडा जर तुम्ही ऐकाल तर धक्का बसेल. होय. ..जर तुम्ही लोकलने प्रवास करणार असाल तर जरा जपूनच..कारण विधानसभेत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीन वर्षात किती जणांचा लोकल प्रवासात मृत्यू झाला याची माहिती दिली आहे.

तीन वर्षात किती प्रवाशांचा गेला बळी?
मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना गेल्या तीन वर्षांत 7,500पेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सुमारे 7,300 जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. गेल्या महिन्यात मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान दोन लोकलमधले प्रवासी एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. तिला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले.
काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?
मंत्री प्रताप सरनाईक यांनी अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, "सरकारी कार्यालयांप्रमाणेच खासगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू. तसंच लोकलची संख्या वाढवून लोकल गाड्यांना बंद होणारे दरवाजे लावण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं आणि यावर सकारात्मक निर्णय लवकरच होईल " असं ते म्हणाले.
लोकलवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न!
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "मुंबई मेट्रोपोलिटन क्षेत्रात मेट्रोचं जाळं वाढल्यामुळे लोकलवरचा भार कमी होईल अशी अपेक्षा होती, मात्र या भागातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसं चित्र दिसत नाही, असं सरनाईक यांनी नमूद केलं. लोकल ही जीवनवाहिनी असली, तरी पॉड टॅक्सी, मेट्रो, जलवाहतूक असे वाहतुकीचे इतर पर्याय वेगाने उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे" अशी ग्वाही त्यांनी दिली.
नाना पटोलेंची सरकारवर टीका
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी, हे पर्याय काल्पनिक असून लोकलची दारं बंद केल्यास त्यामध्ये चिरडून लोकांचा जीव जाईल, अशी टीका केली. त्यावर सरनाईक यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली.
मुंब्रा रेल्वे अपघाताची दुःखद घटना
9 जून 2025 रोजी मुंब्रा स्थानकावरील एका वळणाजवळ दोन चालत्या गाड्यांमधून पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला होता ही दुःखद घटना फारच क्लेशदायी होती. या घटनेने मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची स्थिती किती भयावह आहे हे दिसून आले. नोकरदारांना आणि अन्य प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
मुंब्रा रेल्वे अपघाताच्या चौकशीत काय घडले?
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, मध्य रेल्वेने (CR) मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, मुंब्रा रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या पथकाने तयार केलेला अहवाल सध्या अंतर्गत पुनरावलोकनाधीन आहे. प्रवासी कार्यकर्ते यतीन जाधव यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या (PIL) उत्तरात CR ने १२ जुलै रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा खुलासा केला आहे.












Click it and Unblock the Notifications