पुढील 24 तास धोक्याचे: मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे-मोनोरेल सेवा विस्कळीत, 'या' जिल्ह्यांना इशारा..
Maharashtra Rain Update news : मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, पुणे, रायगड आणि रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईची स्थिती: 'लोकल' आणि 'मोनोरेल' ठप्प
रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे आज, सोमवारचा दिवस मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरला आहे.
रेल्वे सेवा
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा या पावसामुळे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, तर हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ५ ते १० मिनिटांच्या विलंबाने सुरू आहे.
मोनोरेल
मुंबईतील मोनोरेल पुन्हा एकदा बंद पडली आहे. गेल्या एका महिन्यात ही तिसरी वेळ आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
रस्ते वाहतूक
दादर, किंग्ज सर्कल, माटुंगा आणि हिंदमाता चौकासारख्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये एक ते दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक थांबवण्यात आली असून ती गोखले ब्रीजमार्गे वळवण्यात आली आहे.
इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर
मुंबईसोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.
ठाणे आणि नवी मुंबई: या परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. पहाटे पावसाने काहीशी विश्रांती घेतली, पण आता पुन्हा एकदा संततधार सुरू झाली आहे.
रायगड आणि रत्नागिरी : या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.
पुणे आणि घाटमाथा : हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जालना : जालना जिल्ह्याला पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि काल अंबड तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
नागरिकांसाठी आवाहन
पुढील काही तास पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.












Click it and Unblock the Notifications