एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी अपडेट, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल
मुंबई : एसटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यभरातील लालपरीची चाकं थांबली आहेत. कर्मचारी संघटनांनी आज संपाची घोषणा केल्याने मुंबई, कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर यासह राज्यातील अनेक आगारातील बसेस जाग्यावरच उभ्या आहेत. दरम्यान, संपाबाबत मोठी अपडेट समोर आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. उद्या संध्याकाळी सात वाजता कामगार संघटनांच्या कृती समितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे.
ऐन गणेशोत्सवासह सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने राज्यभरातील चाकरमान्यांसह प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या असा इशारा देत राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचारी संघटनांमधील काही संघटनांचा या संपाला विरोध असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यातील विविध आगारातील बसेस बाहेर न पडल्याने गावखेड्यातील प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे.

पवार, ठाकरेंच्या पिलावळांचा संप; सदावर्तेंचा आरोप
एकीकडे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला तरी दुसरीकडे या संपाला कष्टकरी जनसंघाचे प्रमुख तथा विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शविला. सदावर्ते यांनी हा संप म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पिलावळांनी पुकारल्याचा आरोप केला. मविआ सरकारच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळणार होता. मात्र टक्केवारीवर नजर ठेवत एसटी कर्मचारी संघटनेनं हा वेतन आयोग लागू होऊ दिला नाही असा गंभीर आरोपही सदावर्ते यांनी केला.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पिलावळांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व लोकं रिटायर्ड हार्ट लोकं आहेत. 'तुम लढो हम कपडे संभालेंगे', अशी ही लोक आहेत. महाविकास आघाडीच्या लोकांनी थोतांड सुरु आहे. कोणत्याच परिस्थितीत कोणालाही टक्केवारी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
या ठिकाणी आंदोलनाची धग
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये या संपाची धग बसल्याचे पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने मुंबई, कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, गुहागर, छत्रपती संभाजीनगर या बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिलेला आहे. एसटी आगाराच्या बाहेरच न पडल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. दुसरीकडे खासगी वाहनचालकांकडून दुपट्टीने भाडे वसूली केली जात असल्याचे देखील चित्र आहे.
कुठेही बंद नसल्याचा सदावर्तेंचा दावा
महाराष्ट्रात कुठेही बंद झालेला नाही, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला. तर गिरीश देशमुख नावाचे अधिकारी उद्धव ठाकरेंचे आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला.
या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications