भुजबळांचा मेळावा ओबीसींचा नव्हे, 'विशिष्ट जात अन् टोळी'चा; जरांगेंचा आरोप, पंकजा मुंडेंचे केले कौतुक
manoj jarange slams chhagan bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (काल) बीड येथे घेतलेल्या ओबीसी महाएल्गार सभेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आणि थेट टीका केली आहे. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, भुजबळ यांचा कालचा मेळावा हा ओबीसी समाजाचा नव्हे, तर एका विशिष्ट जातीचा आणि टोळीचा मेळावा होता.
जरांगे पाटील यांनी भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांवर टीका करताना म्हटले की, हे लोक फक्त ओबीसींच्या नावाने ओरड करून आपला राजकीय स्वार्थ साधतात. गोरगरीब ओबीसी समाजाचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. आपला राजकीय स्वार्थ साधताना ओबीसी समाज खड्ड्यात गेला तरी या लोकांना चालतो, असा कठोर आरोप त्यांनी केला.

ओबीसींचा केवळ स्वार्थासाठी वापर
मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, हे नेते ओबीसी समाजाचा केवळ आपल्या स्वार्थासाठी वापर करत आहेत. जरांगे म्हणाले, "त्या घुरट छगन भुजबळांनी सांगितले आहे की, मी ओबीसी म्हणून बोंबललो की, मला न देणारे मंत्रिपद द्यावे लागले. धनंजय मुंडेंनाही मिळे." यावरून हे सिद्ध होते की, या लोकांचा ओबीसी मोठा व्हावा हा उद्देश नाही.
जरांगे म्हणाले की, या लोकांचा अजेंडा स्पष्ट आहे. ओबीसींच्या आडून आपल्या पक्षाला ब्लॅकमेल करायचे आणि मंत्रिपदे मिळवायची. हे लोक आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी 'मराठा-ओबीसीत तणाव निर्माण करून' ओबीसी समाज खड्ड्यात गेला तरी चालेल, असे षडयंत्र रचत असल्याचा दावा जरांगे यांनी केला.
पंकजा मुंडे यांनी अंतर राखल्याबद्दल कौतुक
भुजबळांच्या सभेवर टीका करतानाच मनोज जरांगे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यापासून किंवा भुजबळांच्या भूमिकेपासून अंतर राखल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा सर्वसमावेशक राजकारणाचा वारसा चालवण्यासाठी भुजबळांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले.
मराठा समाजाचे मत
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील मराठ्यांचे हेच मत आहे की, त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. मराठा समाजाने त्यांना २५-३० वर्षे राजकीय करिअर दिले आहे, बहुधा त्यामुळेच त्यांनी आपल्या भूमिकेत सुधारणा केली असावी.
जरांगे यांच्या मते, भुजबळांचे चक्रव्यूह प्रचंड घातक आणि विषारी आहे. त्या षडयंत्रात एकदा शिरले की बाहेर पडणे कठीण होते. पंकजांना 'आपण या जाळात पडूच नये' असे वाटले असावे आणि त्या या चक्रव्यूहातून बाहेर पडल्याचे दिसत आहे.
आरक्षणाशी देणेघेणे
पंकजा मुंडे यांच्या भूमिकेतील सुधारणेचे कौतुक करताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, "इथून मागे जे बोललो ते बोललो, पण इथून पुढे सुधारणा करायची असे त्यांना वाटले असेल. हे चांगले आहे. त्यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलू नये. आम्हाला त्यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. आम्हाला फक्त आरक्षणाशी देणेघेणे आहे," असे जरांगे पाटील यांनी ठामपणे नमूद केले.












Click it and Unblock the Notifications