विजयाची शक्यता तिथेच निवडणूक लढणार अन् जो बॉंड पेपरवर लिहून देईल त्याला साथ देणार- जरांगेंची घोषणा
Manoj Jarange Patil : आम्हाला आमचा हक्काचा आमदार द्यायचा आहे. त्यामुळे समाजातील लोकांनी आपली जात बघा, नेता पाहू नये. जिथे आमची ताकद आहे, त्या ठिकाणीच उमेदवार देणार तर अन्य ठिकाणी आम्ही अन्य लोकांना साथ देणार आहोत, कोणता मतदारसंघ असेल त्याची घोषणा सायंकाळी पाच नंतर करू असे जरांगे पाटील म्हणाले. ते आंतरवाली सराटीत माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ज्या ठिकाणी आमची ताकद नाही किंवा उमेदवार जिंकून येऊ शकत नाही, अशा ठिकाणी आम्ही कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीला किंवा कोणत्याही उमेदवाराला साथ देऊ, पण त्याने आम्हाला व्हिडिओ व 500 रुपयाच्या बॉंड पेपर लिहून देत समाजाच्या पाठिशी असल्याचे वचन दिले पाहिजे, त्याला आमची साथ राहणार आहे.
सांगूनही तो ऐकत नसेल तर तो आपला नाही
उमेदवार जाहीर करण्याबाबत मनोज जरांगे म्हणाले, ज्या मतदारसंघात ज्याला वाटते की आपण निवडणूक लढवली पाहिजे, अशा लोकांनी अर्ज भरा. ऐनवेळी आपण ठरवू की उमेदवार कोण असेल. ज्याला मी सांगेन त्याने अर्ज मागे घ्यायचा. पण जर मी सांगूनही एखाद्याने अर्ज मागे घेतला नाही तर तो आपला नाही. त्याला मदत करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार मराठा बांधवांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता त्यापैकी कोण अधिकृत उमेदवार असेल आणि कुणी अर्ज मागे घ्यायचा यावर आज सायंकाळी निर्णय होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा-मुस्लिम-मागासवर्गीय असे समीकरण तयार करत या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली आहे. या निमित्त अंतरवाली सराटी येथे मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी देखील काही दिवसांपूर्वी येऊन गेले आहेत. यावेळी आनंदराज आंबेडकर देखील उपस्थित होते.
महायुतीला मोठे आव्हानाची शक्यता
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनोज जरांगे यांनी महायुतीला विरोध केला होता. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महायुतीला अनेक जागांवर फटका बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता तर मनोज जरांगे यांनी त्यांचे उमेदवार मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे नक्कीच महायुतीला या विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications