जरांगे पाटलांची मोठी घोषणा : मुंबई मोर्चाचा सांगितला प्लॅन; जाणून घ्या-अंतरवाली ते मुंबईचा प्रवास!
Manoj Jarange Patil Announces Maratha reservation Morcha Route : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहत, अंतरवाली सराटी (जालना) इथून काढण्यात येणाऱ्या मुंबई मोर्चाचा सविस्तर प्रवास योजना आणि मागण्या आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्या.

जरांगे पाटील यांनी जाहीर केलेला मोर्चाचा प्रवास खालीलप्रमाणे..!
- प्रारंभ : २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मोर्चाला सुरुवात होईल.
- पहिला मुक्काम: अंतरवालीतून निघाल्यानंतर पहिला मुक्काम किल्ले शिवनेरी येथे होईल.
- शिवनेरी ते मुंबई : २८ ऑगस्ट रोजी शिवनेरीवरील माती कपाळी लावून तेथून मुंबईकडे कूच करतील.
- प्रवासाचा मार्ग : छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे मार्गे पुढे लोणावळा, वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार.
- मुंबईत आगमन : २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत आझाद मैदान, मुंबई इथं पोहोचण्याचे नियोजन आहे.
यापूर्वी कल्याणवरून जाण्याचा विचार होता, पण शिष्टमंडळाने घाटाची पाहणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुके असल्याने वाशीमार्गे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, मुंबईत लोकांच्या गैरसोयीशिवाय पोहोचण्यासाठी कोणताही एक रस्ता आम्हाला उपलब्ध करून द्यावा.
उपोषणाची सुरुवात, उपोषण कधी?
२९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होईल.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य मागण्या
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर संबंधित प्रश्नांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत...!
- मराठा-कुणबी एकत्रीकरण: शासनाने काढलेल्या 'मराठा आणि कुणबी एकच आहेत' या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी.
- गॅझेटियर लागू करा: हैदराबाद गॅझेटियर, सातारा संस्थानचे गॅझेटियर आणि तत्कालीन बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेटियर हे तीन गॅझेटियर लागू करून अंमलबजावणी करावी. 'आता अभ्यास सुरू आहे,' हे कारण ऐकून घेतले जाणार नाही.
- सगेसोयरे अध्यादेश: सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी दिलेला दीड वर्षांचा वेळ आता संपला असून, आता थांबणार नाही. ज्याची कुणबी नोंद सापडेल, त्याला प्रमाणपत्र त्वरित द्यावे आणि ओबीसींच्या विरोधाकडे लक्ष देऊ नये.
- गुन्हे मागे घ्या: मराठा आरक्षणाच्या लढ्यावेळी ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे सरसकट मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत.
- बलिदान्यांना मदत: मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी आणि आर्थिक निधी अजूनही मिळालेला नाही. हे लाभ तात्काळ मिळावेत.












Click it and Unblock the Notifications