मनोज जरांगे यांच्यावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल; गुन्ह्याबाबत जरांगे पहिल्यांदा मनातलं बोलले...
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सध्या बीडमध्ये प्रचंड आंदोलन सुरु असून त्यांच्याविरुद्ध पहिल्यांदाच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध बीडमध्ये कधीच काही झालं नाही. आता या घराण्याच्या मनाविरुद्ध होत असल्यानेच आपल्यावर गुन्हा दाखल झाला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

काय म्हणाले मनोज जरांगे?
गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, आरोपींना संतोष देशमुख यांचा खून पचवायचा होता, हे माझं मत आहे. आम्ही मस्साजोगला बसून गुन्हा दाखल करून घेतला. गुन्ह्यात आरोपींची नावे टाकून घेतली. हीच त्यांची खदखद होती. बीड जिल्ह्यात आतापर्यंत यांच्या मनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता. म्हणून यांची माझ्यावर जळजळ आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. ते पुढे म्हणाले, बीडमध्ये त्यांनी गुंडगर्दी आहे. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल झालेली ही पहिली केस आहे. नाही तर हे सांगतील तसे गुन्हे दाखल होत होते.
हे आंदोलन लाभार्थींचे
मनोज जरांगे पाटील हे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेध व्यक्त करत जरांगे, आ. सुरेश धस, अंजली दमानिया आदींच्या विरोधात सध्या बीडमध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरही जरांगे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मुंडे घराण्याने स्वत:च्या हाताने त्यांची पत घसरवली आहे. त्यांचा सर्वांनाच त्रास होता. ठरावीक लोक इतरांना त्रास देत होते. जातीचा काही संबंध नव्हता. आता माझ्या विरोधात जे आंदोलन करत आहेत ते या घराण्याचे लाभार्थी आहेत. या लोकांनी ओबीसींचं आरक्षणही खाल्लं आहे. तेच माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांच्या मनाविरुद्ध घडतंय. याआधी कुणाची शाळा हडप, कुणाचा प्लॉट हडप, शेत हडप, कॉन्ट्रॅक्ट बळकव, असे प्रकार सर्रासपणे सुरू होते. पण आम्ही गुन्हा दाखल करून घेतला. त्यामुळे त्यांची आमच्यावर नाराजी होती. म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा जरांगे यांनी केला.
जातीवाद कधी केला?
जरांगे म्हणाले, मी जातीवाद केला म्हणून आंदोलन सुरु आहे. आम्ही कोणता जातीवाद केला, दाखवा बरं? आजपर्यंत या राज्यातील एकाही जातीला मी दुखावलेलं नाही. नेते आमचे असो की तुमचे असो, ते कुणाचेच नसतात. त्यांना बोलायचं नाही का? त्यांची मस्ती अशीच चालू द्यायची का? खून होऊ द्यायचे का? आम्ही वंजारी, धनगर, आदिवासी, दलित, मुस्लिमांना कधीच काही बोलत नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications