पराभवाची कारणे सांगत खर्गेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धो-धो धूतलं; राहुल गांधींसमोरच म्हणाले...
Congress executive meeting- हरियाणा आणि आता महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. लोकसभेला केलेली कामगिरी, या दोन्ही राज्यातील विधानसभेत कायम ठेवता आली नाही. याच पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यात त्यांनी या दोन्ही राज्यातील नेत्यांना चांगलेच सुनावले.

आपणच आपला पराभव केला
या बैठकीमध्ये बोलताना खर्गे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर तीन राज्यांतील विधासभेत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. इंडिया आघाडीनं चारपैकी दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं. मात्र त्यामध्ये काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. मी पुन्हा- पुन्हा हेच सांगतो. आपल्या पराभवाची दोनच कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, पक्षात असलेला एकजुटीचा अभाव आणि दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद. एकमेकांविरोधात देण्यात येणारी स्टेटमेंटमुळे पक्षाचं मोठं नुकसान होतय. हे वेळीच थांबवलं गेलं नाही, तर याचा मोठा फटका बसेल, अशा शब्दात खर्गे यांनी नेत्यांना खडसावले.
राहुल गांधींचीही उपस्थिती
काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये 99 जागा जिंकल्या होत्या. राजकीय तज्ज्ञांच्या मते काँग्रेसचंदमदार पुनरागमन केलं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसला केवळ 16 जागाच जिंकता आल्या. या दोन्ही पराभवानंतर काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पराभवाचं कारण सांगितलं. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांची देखील उपस्थिती होती.
राज्यातील मुद्यांकडे देणार लक्ष
या बैठकीत आगामी काळात काय करायचंय, याचीही चर्चा झाली. खर्गे म्हणाले, ज्या राज्यात आपला पराभव झाला, तिथे आपली संघटना मजबूत नव्हती असं म्हणावं लागेल. आपल्याला त्या राज्यातील संघटना अजून मजबूत करण्याची गरज आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची मोट बांधावी लागणार आहे. सोबतच त्या -त्या राज्यात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे. तेथील स्थानिक मुद्दे आपल्या लक्षात घ्यावे लागतील, त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रूपरेषा तयार करावी लागेल, असंही खर्गे यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications