निकालाआधीच 'मविआ'मध्ये मोठी हालचाल; बंडखोर अन् अपक्षांशी संपर्क करून आश्वासनांची खैरात
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी दि.23 जाहीर होणार आहे. पण तत्पूर्वी, विरोधकांच्या महाविकास आघाडीने आकड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मविआमध्ये मोठी हालचाल पाहायला दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मविआच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभरातील निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर उमेदवारांसह अपक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. सत्ता स्थापनेच्या शर्यतीत काही जागा कमी पडल्या तर या उमेदवारांच्या मदतीने महाराष्ट्राचे सत्ताशिखर गाठण्याची महाविकास आघाडीचा मानस आहे. त्यानुसार या नेत्यांशी संपर्क साधला जात आहे, असा दावा केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली. तत्पूर्वी एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण महाविकास आघाडीने हे पोल फेटाळून लावत, आपल्या पातळीवर बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी गोळाबेरीज सुरू केली आहे.

जयंत पाटील, बाळासाहेब थोरात एक्टिव्ह मोडमध्ये
यासंबंधी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर व अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधत आहेत.
शिरसाट यांच्या दाव्यामुळे भाजप सतर्क
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांसोबत जाण्यासंबंधीचे संकेत दिलेत. त्यामुळे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे धाबे दणाणलेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तत्काळ हे वृत्त फेटाळून लावले आहे. पण शिरसाट यांचे संकेत व त्यानंतर दरेकरांनी दिलेले स्पष्टीकरण यावरून महाविकास आघाडीत खूप काही शिजत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
महायुतीकडून देखील संपर्क करणे सुरू
दुसरीकडे, महायुतीच्या गोटातही अशीच खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आहे. महायुतीच्या नेत्यांनीही विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बंडखोर व अपक्ष उमेदवारांसी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. यावरून राज्यात महायुती व महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी काही जागांची गरज भासली तर त्यासाठी प्रचंड घोडेबाजार रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications