कुठे ४५ अंशाचा पारा, तर पुण्याला पावसानं झोडपलं; गारपिटीने शेतीचं मोठ्ठं नुकसान, कुठे काय झालं? वाचा
राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. गेल्या आठवडाभरापासून अनेक जिल्ह्याचा पारा हा ४० अंशांच्या पुढे आहे. मात्र आज अचानक महाराष्ट्राचं हवामान बदललं. आजपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरु झाला. जळगाव, गोंदीयासह पुणे जिल्ह्याला आज अवकाळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी गारपिटही झाली. त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

पावसाने शेतीचे नुकसान
महाराष्ट्रातील हवामान बदलल्याने हातातोंडाशी आलेल्या घास निसर्गानं हिरावून घेतला. आज पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेली लावली. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा, मितावली शिवारात जोरदार गारपीट झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात गारपिट
जळगाव तालुक्यातील भादली, खेडी भोकर , भोकर, तसेच यावल तालुक्यात मोहराळा सावखेडा यासह इतर गावांमध्ये देखील गारपिटीसह पाऊस झाला. या गारपिटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील गहू, कांदा, केळी, मका व इतर पिकांसह फळपिकांना मोठा फटका बसला. चोपडा तालुक्यात अंदाजे साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सकाळी कडाक्याचं ऊन पडलं असताना, दुपारच्यावेळी अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली.
पुणे जिल्ह्याला झोडपलं
पुणे जिल्ह्यालाही आज पावसाने चांगलंच झोडपून कढलं. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. फळबागांना मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले. पावसाने अचानक हजेरी लावल्याने मात्र पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र उन्हाचा तडाखा कमी झाला.
हवामान अचानक बदललं
राज्यातील अनेक जिल्ह्यात दुपारपर्यंत चांगले ऊन तापले. मात्र दुपारनंतर अचानक हवामान बदललं. अचानक काळे ढग तयार होऊन जोरदार गारपीट झाली. गोंदिया जिल्ह्यातही वातावरणात गारवा जाणवला. हवामान खात्याने जिल्ह्याला जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications