Maharashtra Weather : थंडीसोबतच राज्यात अवकाळीचा इशारा, जाणून घ्या आज कसे आहे हवामान?
Maharashtra Weather : राज्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गारठा वाढत आहे. येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे.
राज्यात दोन दिवसात हलक्या पावसासोबतच काही ठिकाणी अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका आणि मध्यम पाऊस पडू शकतो. इतर काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान उत्तर भारतातून गार वारे येत अशल्याने राज्यात गारवा राहणार असून अनेक ठिकाणचे तापमान घसरुन अकरा अंश सेल्सियसवर गेले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान निचांकावर आले असून मध्य महाराष्ट्रातही हिच स्थिती आहे. सोलापूर, सांगली, नाशिक, पुणे, गोंदिया आणि नगर येथे पारा आठ अंशावर तर यवतमाळ येथे 7.6 अंशावर पारा पोहचला आहे. इतर जिल्ह्यात दहा ते बारा अंशावर पारा पोहचला आहे.
दिल्लीसह उत्तर भारतात स्थिती काय?
दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीचा प्रभाव आणखी वाढू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. हलका पाऊस, दाट धुके आणि थंड वारे यामुळे संपूर्ण उत्तर भारतात थंडी वाढत आहे.
5 जानेवारीला दिल्लीत ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. त्यामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 4 किमी असेल, जो दिवसभरात ताशी 6-8 किमीपर्यंत पोहोचू शकतो. सोमवारी कमाल तापमान 18 अंश तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
रविवारी (5 जानेवारी) दाट धुक्यामुळे राजधानीत साडेतीन तास दृश्यमानता खूपच कमी होती. पहाटे 4 ते 7:30 या वेळेत IGI विमानतळावर शून्य दृश्यमानतेची नोंद करण्यात आली. त्यामुळे रेल्वे आणि विमान सेवांवरही परिणाम झाला.
हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचे दिवस आणि दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रासह देशभरातील कसं असेल तापमान, कुठे पडणार पाऊस तर कुठे असेल सर्वाधिक थंडी, वाचा सविस्तर
लखनऊ हवामान केंद्राने म्हटले आहे की मिर्झापूर, चंदौली आणि सोनभद्र वगळता संपूर्ण राज्यात थंडीचा इशारा आहे. बहराइच, गोंडा, अयोध्या, कानपूर, लखनौ, गाझियाबाद, नोएडा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यांवरून वाहने संथ गतीने जात असून अनेक गाड्या तासनतास उशिराने धावत आहेत.
वाढती थंडी टाळण्याचे उपाय : या कडाक्याच्या थंडीत लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या. घरामध्ये हीटर किंवा बोनफायर वापरा आणि आवश्यक नसल्यास बाहेर जाणे टाळा. बाहेर जाणे आवश्यक असल्यास, उबदार कपडे घाला आणि आपला चेहरा चांगला झाका.
हेही वाचा : हिवाळ्यात जाणवतेय गर्मी! ...म्हणून नोव्हेंबरमध्ये थंडी नाहीच, 'हे' आहे सर्वात मोठे कारण, वाचा
उत्तर भारतात हिवाळ्याचा प्रकोप किती काळ टिकेल?
जानेवारीच्या मध्यापर्यंत थंडी आणि शीतलहरीचा प्रभाव कायम राहू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे तापमानात आणखी घसरण होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications