SSC HSC Exams Results : जाणून घ्या 10वी, 12वीचा निकाल कधी लागू शकतो? मंत्री शेलारांनी दिल्या सूचना
Maharashtra SSC HSC Exams Results 2025 : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचे निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे, याचे मोठे कारण म्हणजे नुकतेच माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी बोर्डाच्या वेबसाइटची क्षमता वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच निकाल लागून वेबसाईटवर तो प्रकाशित होईल अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात एसएससी इयत्ता 10वी आणि HSC इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षा मार्च महिन्यात संपल्या आहेत. आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतिक्षा आहे, ते निकालाची वाट पाहत आहेत. निकाल काय लागेल आणि कधी लागेल हीच चिंता विद्यार्थ्यांना आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाइटची क्षमता वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करा, असे निर्देश बोर्ड अधिकाऱ्यांना दिले आहेत, त्यामुळे लवकरच निकाल लागेल ही शक्यता व्यक्त केली जात आहे.
का दिले मंत्री शेलार यांनी निर्देश?
महाराष्ट्रात इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर होत असताना, वेबसाईटवर प्रचंड ट्रॅफिक असते, त्यामुळे वेबसाईट हँग होणे, संथ चालने आदी प्रकार घडतात अशा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास अडचणी येतात, त्यामुळे या समस्या ऐन निकालाच्या दिवशी येऊ नयेत, म्हणून तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी निर्देश दिले आहेत.
नुकतीच शेलार यांनी यासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या संयुक्त आढावा बैठकीत मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. लाखो विद्यार्थी एकाच वेळी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी वेबसाइटवर लॉग इन करतात. त्यामुळे बोर्डाच्या वेबसाइटची नियमित लोड चाचणी आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे या निकालासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये वेबसाईट सुरुळीत चालावी यासाठी उपाय करण्याचे त्यांनी या बैठकीत निर्देश दिले आहेत.
दहावीच्या 16 लाख विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झाली होती. या परीक्षा 17 मार्च 2025 रोजी संपल्या. 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर यामध्ये 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 19 ट्रान्सजेंडर परीक्षार्थी होते. 5 हजार 130 मुख्य केंद्रांवर परीक्षा पार पडली.
बारावीच्या 15 लाख 5 हजार विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यापैकी 8 लाख 10 हजार 348 विद्यार्थी (मुले) आणि 6 लाख 94 हजार 652 विद्यार्थी (मुली) तसेच 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थी होते.












Click it and Unblock the Notifications