'चुका सुधारा, अन्यथा एकत्र राहण्यात काही अर्थ नाही'; उद्धव ठाकरेंचा शरद पवारांसह कॉंग्रेसला सज्जड दम
Uddhav Thackeray on MVA future direct warning to Sharad Pawar and Congress : 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीच्या (MVA) भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून मित्रपक्षांना सज्जड दम भरला आहे.
जर लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती विधानसभेत झाली नसती तर चित्र वेगळे असते, असे सांगत त्यांनी भविष्यात या चुका सुधारल्या नाहीत तर 'एकत्र राहण्यात काही अर्थ नाही,' असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागा जिंकून महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला जबरदस्त धक्का दिला होता. हा विजय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाची लाट घेऊन आला.
मात्र, हा उत्साह अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मावळला आणि महायुतीने MVA चा दारूण पराभव केला. 288 सदस्यांच्या विधानसभेत शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसला मिळून केवळ 46 जागांवर समाधान मानावे लागले.
या पराभवामागे पक्षांमधील 'वैयक्तिक अहंकार' आणि 'जागा वाटपातील गोंधळ' हेच मुख्य कारण असल्याकडे उद्धव ठाकरे यांनी 'सामना' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
"जनतेला चुकीचा संदेश गेला"
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत, विधानसभा निवडणुकीदरम्यान जागा वाटपावर शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या चर्चांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "या भांडणामुळे (महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमधील) जनतेला आमच्याबद्दल चुकीचा संदेश गेला. काही मतदारसंघांमध्ये तर उमेदवारच निश्चित झाले नाहीत, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला," असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या चुकांची त्यांनी 'मोठी चूक' अशी नोंद केली असून, त्या 'दुरुस्त कराव्याच लागतील' असे ठामपणे सांगितले. जर भविष्यात अशाच चुका होत राहिल्या तर 'एकत्र राहण्यात काही अर्थ नाही,' या त्यांच्या विधानाने आघाडीच्या एकजुटीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
'लाडकी बहीण' आणि सवलतींच्या योजनांचा फटका
केवळ जागा वाटपच नाही, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान मित्रपक्षांमध्ये सवलती जाहीर करण्याच्या लागलेल्या शर्यतीचाही महाविकास आघाडीला फटका बसल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. 'सामना'मध्ये त्यांनी 'लाडकी बहीण' सारख्या काही 'दिशाभूल करणाऱ्या योजनां'चा उल्लेख करत, अशा योजनांचा निवडणुकीच्या निकालावर विपरीत परिणाम झाल्याचे सूचित केले.
उद्धव ठाकरे यांच्या या थेट आणि कठोर विधानांमुळे महाविकास आघाडीच्या भविष्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात ही आघाडी आपल्यातील मतभेद आणि चुका दूर करून एकसंध राहते का, की ठाकरेंच्या इशाऱ्यामुळे नवे राजकीय समीकरण उदयास येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications