Sunetra Pawar : फडणवीसांच्या 'गुप्त' दिल्ली दौऱ्यानंतर आता सुनेत्रा पवारही जाणार; आज पदभार स्वीकारला
Sunetra Pawar Meeting Modi Shah : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री (9 फेब्रुवारी) घेतलेल्या अचानक आणि 'गुप्त' दिल्ली भेटीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असतानाच, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील दिल्ली दौऱ्यावर निघाल्या आहेत. या लागोपाठ होणाऱ्या दिल्ली वाऱ्यांमुळे राज्यात लवकरच एखादा मोठा राजकीय निर्णय किंवा विलीनीकरणाचा सोहळा पार पडणार का? अशा चर्चांना बळ मिळाले आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांची 'मिडनाईट' दिल्ली भेट
सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत दाखल झाले. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत महत्त्वाची बैठक घेतली आणि आज सकाळीच ते मुंबईत परतले.
हा दौरा इतका गोपनीय आणि तातडीचा होता की, यामुळे महायुतीमध्ये काही तरी 'मोठे' शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भविष्यातील भूमिकेबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
आता सुनेत्रा पवारांची पाळी: भेटींचे सत्र सुरु
मुख्यमंत्री मुंबईत परतत असतानाच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज (मंगळवार, १० फेब्रुवारी) संध्याकाळी ६:४५ वाजता दिल्लीत पोहोचत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरची ही त्यांची पहिलीच 'सौजन्य भेट' असल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती बरंच काही सांगून जात आहे. सुनेत्रा पवार बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
विलीनीकरणाची टांगती तलवार?
राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विलीनीकरणाची. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यांचा केंद्रबिंदू हा 'विलीनीकरणाचा फॉर्म्युला' असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात मित्रपक्षांशी याबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली असून, दिल्लीतील हायकमांडकडून त्याला अंतिम मूकसंमती मिळण्याची प्रतीक्षा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचा 'बूस्टर डोस'
या सर्व राजकीय घडामोडींना नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांची पार्श्वभूमी आहे. या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
जिल्हा परिषद पक्षीय बलाबल : एकूण ७३१ जागा
| पक्ष | जिंकलेल्या जागा |
भाजप | २३३ |
राष्ट्रवादी (अजित पवार गट) | १६७ |
शिवसेना (शिंदे गट) | १६२ |
एकूण महायुती | ५६२ |
महाविकास आघाडीची स्थिती:
काँग्रेस: ५६
शिवसेना (उद्धव ठाकरे गट): ४३
राष्ट्रवादी (शरद पवार गट): २६
एकूण मविआ: १२५
अजित पवार गट 'किंगमेकर'च्या भूमिकेत
जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने १६७ जागा जिंकून राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही (१६२ जागा) मागे टाकले आहे. या विजयामुळे महायुतीमधील अजित पवार गटाचे वजन वाढले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वी पक्षाची पुढची दिशा ठरवण्यासाठी दिल्लीतील या भेटी निर्णायक ठरणार आहेत.












Click it and Unblock the Notifications