राज्यात मान्सूनचा जोर वाढला, 'या' जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर; पुढील 4 दिवस महत्त्वाचे
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवसांत हवामान अधिकच अस्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई या भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 19 जूनपासून 22 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये विविध प्रकारचा पाऊस अनुभवायला मिळणार आहे.
मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, काही भागांत अतिवृष्टीची शक्यता
कोकण किनारपट्टीतील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत 19 जून रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसाठी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, शहरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत 70 मिमीहून अधिक पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे आणि लोणावळ्यात पावसाचा जोर, वर्षभरातील विक्रमी पावसाची नोंद
पुण्यातही सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून, शहराच्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. लोणावळा परिसरात गेल्या 24 तासांत 221 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 323 मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा आतापर्यंत 1166 मिमी पावसाचा आकडा पार झाला आहे.
घाटमाथ्यावरही पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा देखील धोक्याच्या झोनमध्ये
घाटमाथ्याच्या भागात, म्हणजेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांत 19 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 ते 22 जून दरम्यान येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांचा धोका
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः लातूरमध्ये 20 जून रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
विदर्भातही पावसाचा जोर कायम; शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष काळजी
विदर्भातही हवामान खूपच अस्थिर राहण्याची शक्यता असून, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. डोंगराळ भागांतील व नदीकिनाऱ्यांवरील नागरिकांनी तसेच पर्यटकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगडमध्ये शाळांना सुट्टी; कुंडलिका नदी इशारा पातळीवर
रायगड जिल्ह्यात पावसाचा विशेष फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
रोहा परिसरातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली असून, परिसरात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications