राज्यात मुसळधार पावसाची हजेरी; मुंबई, कोकण, पुणे आणि रायगडमध्ये अलर्ट, पुढील 5 दिवस महत्त्वाचे
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मॉन्सूनने जोर धरला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीला सतत मुसळधार पावसाचा तडाखा बसतो आहे. त्यात आज पहाटेपासून पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक जाणवली.

पुण्यात गेले दोन दिवस रिमझिम सरी पडत होत्या, मात्र आज पहाटेपासून पावसाने जोर धरला. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातही रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह प्रचंड पाऊस झाला. अलिबाग, मुरूड, पेण, माणगाव आणि रोहा तालुक्यांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुढील पाच दिवस पावसाचा इशारा, कोकण, विदर्भात सतर्कता आवश्यक
हवामान विभागानुसार महाराष्ट्रात आगामी पाच दिवस कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्येही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे, परंतु अधूनमधून हलक्याफुलक्या सरी पडत आहेत. सोमवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रांमध्ये अनुक्रमे 6 मिमी इतकी पावसाची नोंद झाली. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात डोंगराळ भागांमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सातपुड्याच्या परिसरातही पावसामुळे लहान नद्यांना पूर येताना दिसतो आहे.
सिंधुदुर्गात दुर्घटना, युवक दुचाकीसह वाहून गेला
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कुडाळ तालुक्यातील माणगाव भागातील वसोली गावात कर्ली नदीवरच्या कुत्रेकोंड पुलावरून पाणी वाहत असताना एक दुचाकीस्वार त्यात वाहून गेला. शिवापूरकडे जात असलेल्या दोन तरुणांनी पुलावरील पाण्याचा अंदाज न घेता दुचाकीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा जोर जास्त असल्यामुळे एक युवक प्रवाहात ओढला गेला, तर दुसरा सुदैवाने वाचला. रात्रीच्या वेळेमुळे मदत मिळण्यात अडथळा आला. स्थानिकांनी शोध घेतला, मात्र तो अद्याप सापडलेला नाही.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- हवामान विभागाच्या अलर्टकडे लक्ष ठेवा.
- सखल भागात वाहतुकीस टाळा.
- नद्यांच्या, नाल्यांच्या जवळ जाणे टाळा.
- गरज असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
राज्यभर पावसाची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications