'महाराष्ट्राचे दोन गुंडे, एक कोकाटे दुसरे मुंडे', घोषणाबाजी करत विरोधकांचा फडणवीस सरकारवर निशाणा
Maharashtra Budget Session 2025, Frist Day Update : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राज्यातील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच "महाराष्ट्राचे दोन गुंडे, एक कोकाटे दुसरे मुंडे," अशी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
तर दुसरीकडे, सभागृहात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानंतरच निर्णय घेणार आहे, त्यामुळे फडणवीस यांनी कोकाटे व मुंडे यांची एका अर्थाने पाठराखण केली.

धनंजय मुंडे यांच्यावरही विरोधकांचा निशाणा
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी मंत्री असतांना कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणावरुन विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या 3 महिन्यापासून विरोधक त्यांचा राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या प्रकरणात नाशिक कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे, यामुळे त्यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
विधिमंडळात राज्यपालांचे अभिभाषण सुरू होण्यापूर्वी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी मविआच्या आमदारांनी दोन गुंडे, एक कोकाटे अन् दुसरे मुंडे, अशी घोषणाबाजी केली. तर दोघांचेही राजीनामे घेण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोकाटे यांच्या विरोधात दानवेंची आक्रमक भूमिका
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत दानवे यांनी सभागृहात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले.
जितेंद्र आव्हाड हातकडी घालून अधिवेशनाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी हातात हातकड्या घालून अधिवेशनाला हजेरी लावली. राज्यात व देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून, त्याचा निषेध करण्यासाठी आपण हातात बेड्या घालून येथे आल्याचे ते म्हणाले.
याच बेड्या धनंजय मुंडेंना घालाव्या का?
यावेळी पत्रकारांनी याच बेड्या धनंजय मुंडे यांना घालाव्यात का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना केला. त्यावर ते म्हणाले, या बेड्या कुणाला घालायच्या हे सरकारच्या मनावर आहे. पण सरकार असे काही करेल असे मला वाटत नाही. त्यांनी खून केलेला नाही हे मी पूर्वीपासूनच सांगत आहे. पण जसे वल्लभभाई पटेल यांनी सांगितले की, गांधी हत्या ही नथुराम गोडसेने केली, पण विचार कुणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसे हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झाला आहे. वाल्मीक कराड हाच आरोपी आहे. तोच सूत्रधार आहे.
आम्ही पहिल्या दिवसापासून हेच बोंबलून सांगत होतो. आता सीआयडीने सर्वच पुढे आणले आहे. पण तो माझा खास माणूस आहे असे कोण म्हणाले होते? मग नैतिकता आहे की नाही? तुमचा खास माणूस असा निर्दयी, क्रूर व पाषाणहृदयी असेल तर करायचे काय? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी उपस्थित करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.












Click it and Unblock the Notifications