लाडकी बहीण योजना बंद होणार?, अजित पवारांनी दिले असे उत्तर की विरोधकही तापले, नेमकं काय घडलं
महायुती सरकारला ज्या योजनेचा सर्वाधिक फायदा झाला. ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कारण, सरकारकडून सातत्याने त्यात बदल केले जात आहेत. नियमावली लावली जात आहेत. अशातच आज महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही, फक्त त्यात दुरुस्ती किंवा बदल होत जाणार आहेत, अजित पवारांच्या या विधानाने विरोधकांच्या भुवयाही उंचावल्या. त्यावेळी विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेतला गेला. ही योजना केवळ निवडणुकीचा जुमला होता का, तेव्हा का नाही नियमावली लावली गेली. आता 2100 रुपये कधी देणार असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केला.
लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे ऊर्जा मिळाली
अजित पवार सभागृहात बोलताना पुढे म्हणाले की, अनेक राजकीय व्यक्तींनी, कृषी, उद्योग, सेवा, शिक्षण तज्ज्ञांनी अर्थसंकल्पाची दखल घेतली. त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केली. कोणताही अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही बाजूने बोलले जाते. विरोधक त्यावर टीका करत असतात. राज्याची निर्मिती झाल्यापासूनचा हा अनुभव आहे. पण यावेळी अर्थसंकल्पाच्या स्वागताचे आणि कौतुकाचे प्रमाण वेगवेगळे मिळाले. यामुळे माझी ऊर्जा वाढली आहे.

ब्रह्मदेव आला तरी सरकार पडणार नाही
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवारांनी आमदारांना 'टाळकी' हा शब्द वापरल्यानंतर आक्षेप घेतला. सभागृहातील सदस्यांना टाळकी म्हणू नका, असे ते म्हणाले. त्यावर अजित पवार म्हणाले, मी आमदारांना नेहमीच सन्माननीय सदस्य म्हणत असतो. पण विरोधक ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावर ही प्रतिक्रिया होती. पण मी एक एक सांगतो, पाच वर्षांत ब्रह्मदेव आला तरी या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही.
कोणतीही योजना बंद होणार नाही
अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, मागील वर्षी जाहीर केलेल्या काही योजना बंद केल्याच्या बातम्या येत आहेत. काही विरोधी आमदारांनी हा प्रश्न मांडला. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, काही योजना ह्या त्या - त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार सुरु केल्या जातात. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात.
विरोधकांना लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारायचा होता. अजित पवारांनी यावेळी या योजनेचे नाव घेतले नाही, पण महायुतीने सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारवर बोजा पडतो, पण आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी तरतूद केली नाही, असा विरोधकांनी आरोप केला. पण अजून पावसाळी अधिवेशन आहे. हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे या दोन अधिवेशनात निधी दिला जाईल, असे अजित पवार म्हणाले.












Click it and Unblock the Notifications