आंबेगावनंतर आता वाईतही शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले- गद्दारांना पाडा..पाडा...अन् पाडा
आंबेगावमध्ये जाऊन दिलीप वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करून शरद पवार यांनी त्यांना पाडण्याचे आवाहन जनतेला केले. दुसरीकडे हाच नारा शरद पवार यांनी आता वाई येथील सभेत देखील दिला. भरसभेत मार्गदर्शन करत असताना एक चिठ्ठी आली अन् पवारांनी वाईच्या गद्दाराला पाडा...पाडा...पाडा असे आवाहन जनतेला दिले.
वाईत नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांनी त्यांना सोडून गेलेल्या सहकाऱ्यांबद्दल कडक भूमिका घेतल्याचं दिसतंय. वळसे पाटलांना गद्दार म्हणून त्यांना पाडण्याचं आवाहन केल्यानंतर आता इतर ठिकाणीही तशीच भूमिका घेतली जात आहे. वाईतल्या भर सभेत शरद पवारांना चिठ्ठी आली आणि गद्दारांचं काय अशी विचारणा झाली. ती चिठ्ठी दाखवत शरद पवार म्हणाले, गद्दारांना पाडा, पाडा पाडा. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

वाईत कशी होत आहे लढत?
वाईमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील आणि शरद पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी वाईमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पिसाळ यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं.
शरद पवार भाषण करत असताना त्यांच्याकडे प्रेक्षकातून एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी पवारांनी वाचली. गद्दारांचं काय असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला होता. त्याचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले की, गद्दारांचं काय अशा प्रश्न विचारण्यात आला आहे. गद्दारांना पाडा, पाडा अन् पाडा.
महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा धोक्यात?
शरद पवार म्हणाले की, आज महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यांच्याकडून प्रश्न सुटत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे मला आभार मानायचे आहेत. लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर भाजपच्या लक्षात आले आणि मग त्यांनी काही निर्णय घेतले. लाडकी बहीण त्याचाच भाग. आमच्या मनात हीच शंका आहे की मध्यप्रदेश प्रमाणे हा सुद्धा निर्णय मागे पडेल. स्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातून अनेक मुली गायब होत आहेत, बेपत्ता होत आहेत.
लोक म्हणतात आमचं ठरलंय
लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार वाईमध्ये गेले होते. आमदार मकरंद पाटील यांच्या कुटुंबातील लग्नासाठी ते उपस्थित राहिले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, "मी मकरंद पाटील यांच्या घरातील लग्नात गेलो. सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. मी उशीरा आलो. त्यावेळी मोठमोठ्या टाळ्या आणि घोषणा होत होत्या. त्याचवेळी मला वाईतील लोकांची भावना समजली होती. आताच्या सभेला जागा बसायला जागा नाही. लोक म्हणतात आमचं ठरलंय."












Click it and Unblock the Notifications