Maharashtra Assembly Election 2024 : वन नेशन वन इलेक्शन वरुन शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. "उद्या 'नो नेशन आणि नो इलेक्शन' अशी स्थिती होईल!असं म्हणत त्यांनी केंद्रातील सरकारवर तसंच राज्य सरकारवर टीका केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, हा देश खूप मोठा आहे. या देशात भाषांची, प्रांताची विविधता आहे. वन नेशन आणि वन इलेक्शन हे संविधान विरोधी आहे. संविधानाच्या निर्मात्यांनी जे स्टॅक्चर तयार केले आहे ते योग्य आहे, पण पुढील राज्यसभा, लोकसभा निवडणुकांसाठी, स्वार्थासाठी हा निर्णय घेतला जात आहे. उद्या 'नो नेशन आणि नो इलेक्शन' अशी स्थिती होईल. ही हुकुमशाही आहे. वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.
मोदी आणि त्यांच्या लोकांनी नवीन संविधान लिहू नये
संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीतील आर्थिक खर्च वाचवण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन घेतलं जात आहे, असं सांगण्यात येतंय पण, त्याआधी देशातील लूट थांबवा निवडणुका ही लूट नाही ती लोकशाहीची गरज आहे. मोदी जर म्हणत असतील की हे खर्च वाचवण्यासाठी आहे तर मोदींना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं? मोदी कधी अर्थ पंडित झाले? असा सवालही राऊत यांनी केला.
ते म्हणाले की, इतक्या वर्षात निवडणुका झाल्या, आपल्या पूर्वजांनी, घटनाकारांनी काळजीपूर्वक तरतुदी केल्या आहेत. मोदी आणि त्यांच्या लोकांनी नवीन संविधान लिहू नये. हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. भाजप भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे. त्यासाठी हे फंडे वापरत आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
मविआत जागा वाटप व्यवस्थित सुरु
संजय राऊत म्हणाले की, मविआत जागा वाटप व्यवस्थित सुरु आहे. आमच्यात कोणतेही भांडण नाही. काही जागांवरुन आमच्यात दुमत असू शकते पण मतभेद नाहीत, ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होणे ही त्यावेळी राज्याची आणि महाविकास आघाडीची गरज होती. जागा वाटपावरून आमच्या वाद सुरू आहेत. मतभदे आहेत. ही तुमची माहिती चुकीची आहे. आमची प्रत्येक जागेवर सहमती आहे.
मीडियातील बातम्या अफवा आहेत. पेरलेल्या आहेत. आम्ही व्यवस्थित चर्चा करत आहोत. सीट टू सीट चर्चा सुरू आहे. इतक्या मोठ्या राज्यात एखाद्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतं. अशा जागा नंतर चर्चेला येतील. त्या फार नाहीत. ओव्हर ऑल आमच्याकडे जागा वाटपाबाबत एकमत अधिक आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मोदींना हरवलं, आता...
जागा वाटपाबाबत बंद खोलीत चर्चा सुरू आहे. बंद खोलीतील चर्चा तुम्हाला का सांगायच्या? पण आमच्यात मतभेद नाहीत. जागा कोणत्या आणि कशापद्धतीने लढायच्या यावर चर्चा सुरू आहे. आम्ही लोकसभेत नरेंद्र मोदींचा पराभव केला. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा पराभव करू. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल. तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटपावर संयमाने चर्चा करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. जिंकेल त्याची जागा हेच आमचं जागा वाटपाचं सूत्र आहे. मुंबईच्या जागांचं वाटप फार कठिण नाही. मुंबईचंही जागा वाटप होईल, असंही त्यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी पुढे येऊन खोट्या प्रचाराचा विरोध करावा
भाजपने समान नागरी कायद्याचा खोटा प्रचार केला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याचं राऊत यांनी सांगितले. यावर राऊत यांनी अजित पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपने खोटा प्रचार केला असं कोण म्हणत असेल तर भाजपसोबत कोण आहे? या खोट्या प्रचाराचा विरोध अजित पवार यांनी पुढे येऊन करावा, असं राऊत म्हणाले.