'रामटेक'मध्ये पुन्हा होऊ शकते बंडखोरी! आमदार आशिष जैस्वाल यांची अपक्ष लढण्याची तयारी
Maharashtra assembly election 2024 : रामटेक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होत आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गट आणि भाजप तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपाचा पेच निर्माण होणार हे निश्चित आहे.

या मतदारसंघाचे सध्याचे आमदार आशिष जैस्वाल आहेत, जे मूळचे शिवसैनिक होते, गतवेळी युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते. आता ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. मात्र, ते अद्याप त्यांनी शिंदे गटात अधिकृतरीत्या प्रवेश केलेला नाही. यामुळे त्यांची पुढील भूमिका स्पष्ट नाही. त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीसुद्धा जवळीक असल्याने, ते भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत, अशीही दबक्या आवाजात चर्चा असते. परंतु, भाजपाचे स्थानिक नेते आणि माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी जैस्वाल यांना विरोध दर्शवला आहे. यामुळे जर जैस्वाल यांनी भाजपत प्रवेश केला, तर रेड्डी बंडखोरी करतील, असे चित्र दिसत आहे.
अपक्ष लढण्याची तयारी
रामटेकच्या जागेवर महायुतीत आतापासूनच रस्सीखेच सुरू आहे. जर हा मतदारसंघ शिवसेनेला (शिंदे गट) मिळाला नाही, तर जैस्वाल अपक्ष म्हणून लढण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे भाजपचे रेड्डी यांच्यासह इतरही काही जण महायुतीकडून इच्छुक आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचा आक्षेप
महाविकास आघाडीतही रामटेक विधानसभा मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडू शकते. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री राजेंद्र मुळक इच्छुक आहेत. बर्वे यांच्या विजयानंतर झालेल्या आभार सभेत रश्मी बर्वे यांनी मुळक हे रामटेक विधानसभेचे पुढील उमेदवार असल्याचे घोषित केले. शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख प्रेम रोडेकर यांनी या घोषणेवर आक्षेप घेतला असून, शिवसेनेचा हा परंपरागत मतदारसंघ असल्याने काँग्रेसने असा दावा करू नये, अशी भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाकडून विशाल बरबटे इच्छुक आहेत. यामुळे महाविकास आघाडीत शीतयुद्ध सुरू झाले आहे.
गतवेळी काय झाले?
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आशिष जैस्वाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांचा 24 हजार 413 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता.
अशा आहेत समस्या
या मतदारसंघातून महामार्ग गेला आहे. पण, ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
प्रमुख समस्या पाहता रस्ते, पाणी आणि वीजपुरवठा या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशी वीज मिळत नाही आणि त्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळत नाही.
नागपूर शहराला लागून असूनही, या समस्या मतदारसंघाच्या विकासाच्या आड येत आहेत.
जातीय समीकरणांच्या दृष्टीने, रामटेकमध्ये कुणबी, नवबौद्ध, दलित आणि आदिवासी मतदारांचे प्रमाण निर्णायक आहे.
या सर्व परिस्थितीवरून असे दिसते की, रामटेक विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक अत्यंत तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक असेल. महायुतीत आणि महाविकास आघाडीत उमेदवार निवडीवरून वाद सुरू असल्यामुळे राजकीय परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications