वडिलांची पुण्याई, स्वतःचे संघटन आणि शेकडो कोटींची विकासकामे; एरंडोलमध्ये अमोल पाटलांचीच चलती
Maharashtra Assembly Election 2024 : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघात यावेळी तब्बल 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र खरी लढत शरद पवार गटाचे डॉ.सतीश पाटील व शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमनराव पाटील यांच्यातच खरी लढत होणार आहे. मात्र जागावाटपानंतर व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडून शिवसेना ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राजीनामे दिल्यामुळे महायुतीचे पारडे जड वाटत आहे.
वडिलांची पुण्याई येणार कामी
एरंडोल-पारोळा मतदारसंघात सध्याचे उमेदवार अमोल पाटील यांचे वडिल चिमनराव पाटील हे आमदार आहेत. मात्र वय जास्त झाल्याने त्यांनी यावेळी स्वतः निवडणूक लढविण्यापेक्षा मुलाला संधी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना साथ देणार्या पहिल्या पाच आमदारांमध्ये चिमनराव पाटील होते. गेल्या निवडणुकीत त्यांनी सतिश पाटील यांचा तब्बल 26 हजार मतांना पराभव केला होता. महायुती सरकारच्या काळात या मतदारसंघात आ. चिमनराव पाटील यांनी कोट्यवधींची विकासकामे केल्याने त्यांचा मुलगा अमोल पाटील यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.

अमोल पाटील यांना समाजकारणाची जोड
अमोल पाटील हे सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत.पाचोरा एमपीएमसीचे ते 13 वर्षे अध्यक्षही होते. या दोन्ही पदांची जबाबदारी सांभाळताना अमोल पाटील यांच्यातील नेतृत्वगूण व सर्वसमावेशक राजकारण मतदारसंघाने पाहीले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना याच समाजकारणाचा फायदा होईल, असे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी
एरंडोल-पारोळा मतदारसंघात शिवसेनेची ताकद चांगली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटही येथील जागेवर आग्रही होता. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शरद पवार गटाला सुटल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले. ठाकरे गटाकडून नानाभाऊ महाजन यांनी अर्जही भरला होता. मात्र तो नंतर मागे घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी तातडीने सामूहिक राजीनामे दिले. जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, माजी सभापती, तालुकाप्रमुख, युवा सेना प्रमुख आदी सुमारे 100 पदाधिकाऱ्यांना सामुहिक राजीनामे देत ठाकरे गटावर राग व्यक्त केला. नाराजांचा हाच गट महाविकास आघाडीचे काम करण्याऐवजी महायुतीचे काम करील, अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
महायुतीची कोट्यवधींची विकासकामे
एरंडोल, पारोळा, भडगाव तालुक्यात महायुतीने गेल्या पाच वर्षांच कोटवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. पारोळा तालुक्यातील भामरखेडा प्रकल्प, एरंडोल व पारोळा येथील जलवाहिनी आदी कामे महायुती सरकारच्या काळात पूर्णत्वाला गेली आहेत. प्रत्येक गावात महायुतीने विकास केला आहे. याशिवाय एरंडोल व पारोळा या दोन्ही नगरपालिकांना वैशिष्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येकी चार कोटींचा निधीही देण्यात आला आहे. त्यातून शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागली आहेत. याशिवाय अल्पसंख्याक वस्त्यांच्या विकासासाठी 75 लाखांचा निधीही खर्च करण्यात आला आहे.
महायुतीने दिला 100 कोटींचा निधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी एमआयडीसी मंजूर करण्याचा शब्दही दिलेला आहे. याशिवाय दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात आ. चिमनराव पाटील यांनी तब्बल 100 कोटी 51 लाखांचा निधीही या मतदारसंघासाठी आणला होता. त्यात पारोळा तालुक्यातील मोंढाळे पूलाला 12 कोटी, कराडी-बोळे पुलासाठी अडीच कोटी, आडगाव फरशीपुलासाठी 1.25 कोटी, एरंडोल तालुक्यातील सुमारे 30 रस्त्यांसाठी निधी, एरंडोल शहरातील तहसील कार्यालय इमारतीसाठी साडेबारा कोटी, एरंडोल येथील प्रांताधिकारी कार्यालयासाठी पाच कोटी, तहसीलदार निवासासाठी 70 लाख, प्रांताधिकारी निवासस्थानासाठी 70 लाख रुपयांचा निधी महायुती सरकारने दिला होता.
महायुतीने गटरस्ते, शिवरस्तेही दिले
याशिवाय भडगाव तालुक्यातील रस्त्यांसाठीही कोट्यवधींचा निधी देण्यात आला होता. पाणंद रस्ते, जिल्हापरिषद शाळांसाठी निधी, देवगाव- अचलगावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी योजना यावरही महायुती सरकारने कोट्यवधींचा निधी दिला आहे. तालुक्यातील सुमारे एक लाख मतदारांना लाडकी बहिण योजनेसारख्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ सरकारने दिला आहे. हे सर्व मतदार यावेळी पुन्हा महायुतीलाच मतदान करतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अमोल पाटील यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications