मतदान संपलं..! कोपरी-पाचपाखाडीत सीएम एकनाथ शिंदे यांचा एकतर्फी विजयी होणार की केदार शिंदे झुंझवणार
Maharashtra Assembly Election 2024 Eknath Shinde vs Kedar Dighe : ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पांचपाखडी हा विधानसभा मतदारसंघ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे तो विशेष लक्ष वेधून घेत आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने या मतदारसंघात उतरवून हा सामना अधिक रोचक बनवला आहे. दिघे विरुद्ध शिंदे अशी ही राजकीय लढत भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळीवर होत आहे. आज 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रीया पार पडली असून आता कोण जिंकणार हे मात्र, येत्या 23 नोव्हेंबरला समजणार आहे.

कोपरी-पांचपाखडी या मतदारसंघातील लढतीला आता राज्याचे राजकीय भविष्य ठरवणारी लढत म्हणून पाहिले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर केदार दिघे, काँग्रेसचे बंडखोर मनोज शिंदे यांच्यामुळे लढाई अधिक रंगलेली आहे. महायुतीने तिरंगी लढतीचा फायदा घेत, एकनाथ शिंदेंचे मताधिक्य वाढवण्यासाठी नियोजन केले आहे. या निवडणुकीत कोणता गट वरचढ ठरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
कोपरी-पांचपाखडीतील सत्तेचा संघर्ष
एकनाथ शिंदे हे या मतदारसंघात 2004 पासून सलग विजयी होत आहेत. 2004 मध्ये ठाणे मतदारसंघ विभाजित झाल्यानंतर कोपरी-पांचपाखडी हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. शिंदे यांनी त्यानंतर या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधली आहे. 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची युती तुटलेली असतानाही, एकनाथ शिंदे यांना एक लाख मते मिळाली होती आणि त्यांनी काँग्रेसचे मोहन तिवारी आणि भाजपाचे संदीप लेले यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. 2019 मध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीत शिंदे यांनी 1,13,000 मतं मिळवून विजय मिळवला.
तिरंगी लढत आणि महायुतीचा डाव
यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने केदार दिघे यांना उभे करून एकनाथ शिंदेंसमोर एक कठीण आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर मनोज शिंदेही या निवडणुकीत उतरले आहेत. महायुतीने ही तिरंगी लढत आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा डाव टाकला आहे. मनोज शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मतविभाजन होऊन एकनाथ शिंदेंना मताधिक्य वाढवण्याचा फायदा होऊ शकतो, अशी योजना महायुतीने आखली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रभाव
2024 लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट लढत झाली. उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे आणि एकनाथ शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यातील लढत एकनाथ शिंदेंच्या गटाच्या बाजूने झुकली. म्हस्के यांना कोपरी-पांचपाखडी मतदारसंघातून 44,338 मतांचे मताधिक्य मिळाले. ही विजयाने महायुतीच्या रणनीतीला आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला ठाण्यात बळ मिळाले.












Click it and Unblock the Notifications