मनोज जरांगेंचा एक इशारा.. अन् लक्ष्मण हाकेंना OBC सीएम मिटिंगमध्ये डावललं! आज 'जेजुरी'तून एल्गार!
Laxman hake obc agitation : राज्याच्या राजकारणात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते लक्ष्मण हाके यांनी आज एक मोठा निर्णय घेत, जेजुरीच्या ऐतिहासिक भूमीतून आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले, याबद्दल हाके यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी आता थेट रस्त्यावर उतरून व्यक्त होणार आहे.

जेजुरी गडावर या .. हाकेंचा ओबीसी समाजाला आवाहन
आज ५ ऑक्टोबर जेजुरी येथे हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यांनी समाज बांधवांना आणि हजारो तरुणांना ओबीसी लढ्यासाठी थेट जेजुरी गडावर येण्याचे आवाहन केले आहे. अन्याय-अत्याचार करणाऱ्या शक्तींविरुद्ध आंदोलन लढ्याची सुरुवात करण्याचे त्यांचे आवाहन आहे.
जातीवादी लोकांचं ऐकू नका.. - जरांगेंचा इशारा
एकीकडे हाके यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत आंदोलन छेडले असतानाच, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे: "जातीवादी लोकांचं ऐकू नका, अन्यथा परिणाम गंभीर होतील." हाके आणि जरांगे या दोन्ही नेत्यांच्या कठोर भूमिकांमुळे राज्याचे ओबीसी राजकारण चांगलेच तापले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेते आणि या आंदोलनांना कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ओबीसींचा 10 ऑक्टोबरपासून मुंबईत एल्गार
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर (शासन निर्णय) विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ओबीसी नेत्यांनी एकत्रितपणे हा जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. सरकारने आवश्यक तो प्रतिसाद न दिल्याने, 'सकल ओबीसी समाजा'चा १० ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा रद्द न करता, 'जैसे थे' ठेवण्याचा ठाम निर्णय या नेत्यांनी घेतला आहे.
एकीकडे ओबीसी नेते मोर्चासाठी सज्ज होत असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या बैठकीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा संघर्ष आता केवळ आरक्षणापुरता मर्यादित न राहता, राजकीय नेतृत्वाच्या संघर्षात बदलल्याचे स्पष्ट होत आहे. या भुजबळ-जरांगे यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे आणि ओबीसींच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काळात आरक्षणाचे भविष्य काय असेल, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications