अजित दादांच्या 'या' दिग्गज नेत्यावर मनोज जरांगेंचा मोठा आरोप! गुन्हा नोंदवण्यासाठी फडणवीसांशी बोलणार
Latur assault case : छावा पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणातील जखमींची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमध्ये येत आज भेट घेतली. अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट होता असा आरोप त्यांनी यावेळी केला. यासह या प्रकरणात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगेंनी कुणावर लावला आरोप?
छावा पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवाराचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. तटकरे यांच्या सांगण्यावरुनच हा हल्ला झाला असल्याचे ते म्हणाले. तेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमध्ये केला आहे.
मी मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलणार - जरांगे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लातूरमध्ये घाडगे पाटील यांच्या भेटीसाठी रुग्णालयात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले. लातूरच्या या घटनेतील नवा आका सुनील तटकरे असल्याचे यावेळी जरांगे पाटील म्हणाले. राज्यात हुकूमशाही सरकार म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका यावेळी केली.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. पक्ष कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषद संपताच अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी तटकरे यांच्याकडे मागणीचे निवेदन देताना पत्ते भिरकावले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात गेम खेळत असल्यावरून छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची करत होते. त्यांनी तटकरे यांच्यापुढे जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे आपल्या समर्थकांसह जुने विश्रामगृह येथे बसले होते. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण झाली. या मारहाणीत छावाचे विजयकुमार घाडगे पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, "काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो."
अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या."












Click it and Unblock the Notifications