"पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? जयंत पाटलांनी उघड केलं विलीनीकरणाचं 'गुपित'; राजकारणात ट्विस्ट
Jayant patil on sunetra pawar ncp merger : बारामतीच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. "आम्ही चार-पाच जण सुनेत्रा वहिनींना भेटलो आणि त्यांना मदतीचा शब्द दिला आहे. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची मुळीच इच्छा नाही," असे खळबळजनक विधान जयंत पाटील यांनी केले आहे. विशेष म्हणजे, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शरद पवार गटात विलीनीकरण होणार का? या प्रश्नावरही त्यांनी सूचक भाष्य केले आहे.

जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाची चर्चा जेव्हा अजित पवारांसोबत सुरू होती, तेव्हादेखील सुनेत्रा वहिनींशी भेट झाली होती. "आम्ही पार्थ पवार किंवा सुनेत्रा वहिनींसाठी 'सपोर्टिव्ह' आहोत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांना काही मदत लागली, तर आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहू," असे सांगत त्यांनी बारामतीमधील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादीचे विलीनीकरण भविष्यात होऊ शकते का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? यावर राजकीय तज्ज्ञांमध्ये दोन प्रवाह आहेत.
विलीनीकरण होण्याची शक्यता का आहे?
१. अस्तित्वाचा लढा: आगामी निवडणुकांमध्ये मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि 'मराठा कार्ड' अधिक प्रभावीपणे वापरण्यासाठी दोन्ही गट एकत्र येणे फायद्याचे ठरू शकते.
२. कार्यकर्त्यांचा दबाव: स्थानिक पातळीवर दोन्ही गटांचे कार्यकर्ते आजही एकमेकांशी जोडलेले आहेत. पक्षात फूट पडल्याने सत्तेचे गणित बिघडत असल्याची भावना त्यांच्यात आहे.
३. कौटुंबिक नाते: राजकीय संघर्ष कितीही टोकाचा असला तरी पवार कुटुंबातील अंतर्गत संबंध विलीनीकरणासाठी पूल ठरू शकतात.
विलीनीकरण का कठीण आहे?
१. नेतृत्वाचा प्रश्न: विलीनीकरण झाल्यास पक्षाचे नेतृत्व कोणाकडे राहणार? अजित पवारांची स्वायत्तता आणि शरद पवारांचे सर्वोच्च स्थान यांचा मेळ घालणे कठीण आहे.
२. कायदेशीर पेच: निवडणूक आयोगाने 'घड्याळ' चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला दिले आहे. विलीनीकरण झाल्यास या चिन्हाचे काय होणार, हा प्रश्न उभा राहील.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भूमिका
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या बातम्या नेहमीच फेटाळून लावल्या आहेत. त्यांची काय भुमिका होती हे बघुया...
प्रफुल्ल पटेल: "आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत. विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही आमचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू," अशी ठाम भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली आहे.
सुनील तटकरे: "अजित दादांच्या नेतृत्वात पक्ष मजबूत होत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर महायुतीसोबत आहोत आणि विलीनीकरणाच्या चर्चा केवळ वावड्या आहेत," असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवारांची नेमकी भूमिका काय?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच बंडखोर नेत्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ज्यांनी विचारधारेसोबत तडजोड केली, त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडणे सोपे नाही. मात्र, शरद पवार हे 'अनप्रेडिक्टेबल' राजकारणी मानले जातात. "राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो," असे त्यांचेच वाक्य आहे.
सध्या ते पक्ष संघटना बांधणीवर आणि नवीन चिन्हावर (तुतारी वाजवणारा माणूस) लक्ष केंद्रित करत आहेत. तरीही, कुटुंबातील सदस्यांच्या भेटीगाठींकडे ते 'खाजगी' म्हणून दुर्लक्ष करत असले तरी राजकारणात त्याकडे 'संकेत' म्हणून पाहिले जाते.












Click it and Unblock the Notifications