जयंत पाटील- बावनकुळे भेट : २५ मिनिटे काय चर्चा झाली? शरद पवारांचे टेन्शन वाढणार का? वाचा...
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचे बोलले जाते. ते अनेकदा शरद पवारांना सोडतील, असेही सांगितले जाते. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली. जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची काल रात्री भेट घेतली. या बातम्यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली. याच भेटीमागे नेमकं काय दडलंय? जयंत पाटलांचे स्पष्टीकरण काय? हेच आपण पाहू...

बावनकुळे-पाटील भेटीची चर्चा
जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याच्या आज बातम्या आल्या. ही भेट काल रात्री उशीरा बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर झाली. काही प्रसारमाध्यमांनी ही भेट एक तसाची झाल्याचे तर काहींनी ही भेट २५ मिनिटांची झाल्याचा हवाला दिला. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. ही भेट नेमकी कशासाठी होती असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असतानाच आता या भेटीवर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
राजकारणात चर्चा सुरु झाल्यानंतर जयंत पाटील यांनी ही भेट कशासाठी घेतली, याचा खुलासा केला. ते म्हणाले, सांगलीच्या काही महसूलच्या प्रश्नावर मी जवळपास दहा ते बारा निवेदने बावनकुळे साहेबांना दिली. ही निवेदनं देण्यासाठी मी त्यांची भेट मागितली होती. यासोबत बरेच प्रश्न होते. त्यासंदर्भात मी त्यांना भेटलो. सायंकाळी सहा वाजेची वेळ होती, मात्र त्यांचं हेअरिंग बराचवेळ चाललं. ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर मी तिथे गेलो, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
भेटीचं कारणही सांगितलं
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा माझ्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. माझा स्टाफ होता. आमची विविध प्रश्नांवर चर्चा झाली, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांच्या उत्तरानंतर ते शरद पवारांना सोडतील, या चर्चा मात्र काही दिवस पुन्हा थांबल्या.












Click it and Unblock the Notifications