कोर्टासमोरील राडा हा धनंजय मुंडेंचा 'प्लॅन'; मनोज जरांगेंनी पुन्हा केले गंभीर आरोप, म्हणाले...
वाल्मिक कराडला आज बीड न्यायालयाने एसआयटीची सात दिवसांची कोठडी दिली. वाल्मिक कराडला कोर्टासमोर हजर केल्यानंतर बाहेर चांगलाच राडा पहायला मिळाला. वाल्मिक कराड व संतोष देशमुख समर्थक आमनेसामने आल्यानंतर घोषणाबाजीने परिसर दणाणला. त्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरु केली. सौम्य लाठीमारही करावा लागला. या सगळ्या गदारोळामागे धनंजय मुंडे यांचीच टोळी आहे, असा थेट आरोप आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.

काय म्हणाले जरांगे?
कोर्टासमोर झालेल्या राड्याबाबत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठीच ते काल पांगरीत आले होते. पडद्यामागे राहून त्याने या लोकांच्या माध्यमातून मोठी माया जमवली आहे. आता स्वतःचे पाप झाकण्यासाठी या टोळीच्या माध्यमातून तो लोकांना रस्त्यावर उतरायला लावत आहे. आजचा प्रकार पाहिला ना..? कुठे आहे संचारबंदी..? बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच जबाबदारी आहेत मुख्यमंत्री फडणवीसांची आहे.
टोळीचा नायनाट करा
जरांगे पुढे म्हणाले की, खंडणी व हत्या हे सगळं एकच आहे. हेच मी पहिल्यापासून सांगत होतो. त्यामुळेच सगळ्यांना मकोका लावा, ही माझी मागणी होती. आता पोलिस, सीआयडी, एसआयटी या सगळ्या तपास यंत्रणात तेच समोर आलंय. अपहरण व खून करताना या सगळ्या आरोपींचे एकमेकांना काँल झालेत. त्याचा व्हिडीओही पोलिसांकडे आलाय. त्यामुळे आता या सगळ्या टोळीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांची आहे. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ठेवायची असेल, त्यांनी तर ही टोळी संपवली पाहिजे.
मुंडेच भांडणे लावतोय
जरांगे म्हणाले, आरोपींनी हत्या केल्यावर वाचण्यासाठी मंत्र्यांना फोन केलेच असतील. ते सगळं बाहेर येऊ द्या. ज्यांना-ज्यांना फोन केले त्या सर्वांवर खूनाचे गुन्हे दाखल करा. चार्टशिटमध्ये हे सगळं यायला हवं. धनंजय मुंडेंची गुंडांची टोळी, परळी-बीडमधील राडा यामुळे त्यांच्या जातीला माना खाली घालाव्या लागल्या आहेत. या माणसाला फक्त पैसे व पद लागतंय. त्याला जातीचंही काहीच देणंघेणं नाही. त्याने फक्त पैशासाठीच जन्म घेतलाय. तोच जाती-जातीत भांडणे लावतोय, असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला.












Click it and Unblock the Notifications