दुःखद! जालन्यात एकाच कुटुंबातील 3 लेकरांचा शेततळ्यात बुडून मृत्यू! दर्शनास जाताना घटना
Jalna News : जालना जिल्ह्यातून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन शालेय मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 जून 2025 उघडकीस आली आहे. यात एक मुलीचा आणि दोन मुलांचा समावेश आहे.
जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातल्या वरुड बुद्रुक येथे ही घटना घडली असून आज सकाळी तिघांचे मृतदेह शेततळ्यात दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले अन् शेततळ्यात बुडाले
प्राप्त सुत्रांच्या माहितीनुसार, यश अनिल जोशी (वय 14 ), दिपाली रमण जोशी (वय 9), रोहन रमण जोशी (वय 7), अशी या मृत मुलांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेमुळे वरुड बुसह परिसरावर हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघेही भावंड काल सकाळी साडेदहा वाजता परिसरातल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यानंतर ते घरी परतले नाही. यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत होते.
रात्रभर शोधाशोध करुन मुलं सापडली नव्हती
लेकरं घरी न परतल्याने कुटुंबियांनी मुलांची शोधाशोध सुरु केली. रात्रभर शोधाशोध करूनही तिघेही मिळून न आल्यानं जाफ्राबाद पोलिसात मुलं हरवल्याबाबत कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांकडूनही मुलांचा शोध घेण्यात आला. दरम्यान आज सकाळी शेततळ्यात तिघांचे मृतदेह आढळून आले, ही बाब जोशी परिवाराला समजताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी जाफ्राबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोन सख्खे एक चुलत भाऊ
मृत मुलांपैकी दिपाली आणि रमण हे दोघे सख्खे बहिण भाऊ होते तर यश हा त्यांचा चुलत भाऊ होता असे सुत्रांनी सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून ते नेमके कसे बुडाले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही, या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
दोन दिवसांपुर्वीच चाकणमध्ये झाला होता तीन शालेय मुलांचा मृत्यू!
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील एका तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. तिन्ही मुलं शालेय विद्यार्थी होते. शनीवारी 31 मे 2025 रोजी ही दुर्घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले होते. चाकणजवळील कडाची वाडी येथील ही घटना दोन ते तीन दिवसांपुर्वीचीच आहे.
ओंकार बाबासाहेब हंगे (वय 13, रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मुळ हंगेवाडी, ता. केज, जि. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय 13, रा. मेदनकरवाडी, मुळ अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय 13, रा. मेदनकरवाडी, मुळ मुखेड, जि. नांदेड) आणि नैतिक गोपाल मोरे (वय 13, रा. मेदनकरवाडी, मुळ झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) अशी चाकण भागात झालेल्या दुर्घटनेतील मृत मुलांची नावे आहेत. चारही तेरा वर्षांची कोवळी मुलं होती.












Click it and Unblock the Notifications