IMD हवामान इशारा : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, कोकण आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट
महाराष्ट्रात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकरच हजेरी लावली. नेहमीपेक्षा तब्बल १२ दिवस आधी म्हणजेच २५ मे रोजी मान्सूनने राज्यात प्रवेश केला. सुरुवातीस दमदार पावसानं राज्यभर झोडपलं, पण त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असून, हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी गंभीर इशारा दिला आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी
पुणे हवामान विभागाचे वैज्ञानिक एस.डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ ते ४८ तास अत्यंत महत्वाचे असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोकणासाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुण्याच्या घाटमाथ्यावर आजपासूनच धोका अधिक असल्यामुळे विशेष खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे. राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सानप यांनी कृषी क्षेत्रासाठी देखील महत्वाची माहिती दिली असून, शेतकऱ्यांनी आता पेरणीस सुरुवात करू शकतात, असंही स्पष्ट केलं आहे.
मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन
मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून सतत पावसाची हजेरी लागलेली आहे. पावसाच्या जोरामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे जलमय झाला असून, पाच फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पश्चिम उपनगरांत अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहनचालक आणि चाकरमानी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईतील पवई, गोरेगाव, बोरीवली, वांद्रे आदी भागांतही सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला दिसून येतो आहे. वाहतूक पोलीसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
कल्याण-डोंबिवलीतही पावसाचा जोर
कल्याण आणि डोंबिवली परिसरात देखील जोरदार सरींचं आगमन झालं आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, अनेक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे वाहनचालकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या भागांमध्ये पूर्वी झालेल्या नालेसफाईचे दावे फोल ठरल्याचं या पावसामुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे.
करुळ घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटात पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्यानंतर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. प्रशासनाने तत्काळ हालचाली करत मातीचा ढिग हटवून तब्बल पाच तासांनंतर वाहतूक पुन्हा सुरू केली.
जळगावमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर भागात वीज पडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. पावसापासून वाचण्यासाठी हे कुटुंब झाडाखाली थांबले असताना अचानक वीज कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. शेतात पेरणी करताना घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची आणि सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला दिला आहे. तसेच स्थानिक प्रशासनांनी आपत्कालीन व्यवस्थेसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications