डेंजरस 48 हावर्स..! राष्ट्रपती राजवट, आमदारांची कर्नाटक- गुजरात वारी आणि बरंच काही...
Power play in Maharashtra- महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल उद्या म्हणजेच शनिवारी जाहीर होईल. त्यानंतर सरकार स्थापनेसाठी फक्त 48 तासांचा अवधी हातात राहील. या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्यावेळी सत्तास्थापनेसाठी आमदारांचा गुवाहाटी दौरा गाजला होता. त्यातून धडा घेऊन आता प्रत्येक पक्ष आपले आमदार सेफ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. या 48 तासांत महाराष्ट्रात काय-काय घडेल, याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सत्तास्थापनेसाठी होणार चुरस
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी केवळ 48 तासांचा कालावधी असणार आहे. या काळात सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही, तर गेल्या निवडणुकीसारखी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निकालानंतर केवळ 48 तास असल्याने हेच दोन दिवस प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेष म्हणजे मतदानानंतर जाहीर झालेल्या विविध संस्थांचे सर्व्हेवरुन महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला समान जागा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी चुरस वाढली आहे.
केवळ 48 तासांत होणार जुळवाजुळव
एक्झिट पोलचे गांभीर्याने घेत नसल्याचे सगळेच पक्ष सांगत असले तरी, या अंदाजांनी सगळ्यांची झोप उडवली आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रचंड चुरस होणार आहे. या निवडणुकीत अपक्षांची भूमिका ही जास्त महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्षांची बार्गेनिंग पाँवर वाढणार आहे. अशा परिस्थितीत अपक्षांची मनधरणी करणे, सत्तास्थापनेच्या आकड्यांची जुळवाजुळव करणे, हे सर्वच पक्षांपुढे आव्हान असणार आहे. त्यातच बच्चू कडू यांनीही तिसऱ्या आघाडीचे सरकार आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगून बाँम्ब टाकून दिल्याने चर्चा वाढल्या आहेत.
काँग्रेस आमदारांची कर्नाटक वारी?
महाराष्ट्रात अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता खरी ठरल्यास सत्ता स्थापनेचा कालावधी वाढू शकतो. अशावेळी आपल्या आमदारांना सांभाळून ठेवणं, एकत्र ठेवणं यासाठी प्रत्येक पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी दुसऱ्या राज्यातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपापल्या आमदारांना ठेवण्याची शक्यता वाढली आहे. काँग्रेस शेजारील कर्नाटकात आपले आमदार घेऊन जाईल, असेही सांगितले जात आहे. कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
भाजपचे आमदार जातील गुजरातला?
भाजप महायुतीच्या आमदारांना शेजारच्या गुजरात राज्यात घेऊन जावू शकते, असा अंदाज आहे. गुजरातमध्ये भाजपची सत्ता असल्याने तेथे त्यांचे आमदार सुरक्षित राहतील, असे बोलले जात आहे. निकालाचा कौल अस्पष्ट आल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं आमंत्रण कुणाला देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता विधानसभेची मुदत संपणार आहे. तोपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळे त्यापूर्वीच ही सारी आव्हाने प्रत्येक पक्षाला पार करावी लागणार आहेत.












Click it and Unblock the Notifications