महाराष्ट्र तापणार! मुंबईसह कोकण किनारपट्टीला 'ऑरेंज अलर्ट'; उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका असह्य होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, विशेषतः कोकण किनारपट्टीच्या भागात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह शेजारील जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

किनारपट्टीवर उष्णतेचे तांडव: पारा वाढणार!
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगरात काही ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. कालच राम मंदिर परिसरात ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे सरासरीपेक्षा ६.४ अंशांनी अधिक आहे.
उद्याचा अंदाज : उद्याही पालघर, ठाणे आणि मुंबईत उष्ण व आर्द्र हवामानाचा 'यलो अलर्ट' कायम राहणार आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील हवेतील ओलावा वाढल्याने उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवणार आहे.
विदर्भ अन् मराठवाड्यात शुष्क वाऱ्यांचा प्रभाव!
केवळ किनारपट्टीच नव्हे, तर उर्वरित महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चढलेलाच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वाहणाऱ्या शुष्क वाऱ्यांमुळे तापमानाची धग अधिक जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १० आणि ११ मार्च रोजी हवामान कोरडे आणि आर्द्र राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान नोंद
- जळगाव: ३९.६°
- सोलापूर: ३९.४°
- सांताक्रुझ (मुंबई): ३८.४°
- बीड: ३८.३°
- सांगली: ३८.२°
- छत्रपती संभाजीनगर: ३७.६°
- सातारा: ३७.३°
पुढील ५ दिवस महत्त्वाचे: हवामान विभागाचा इशारा
पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई हवामान केंद्राने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा प्रभाव सर्वाधिक राहणार असल्याने वृद्ध, मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.












Click it and Unblock the Notifications