'भारत आता तंत्रज्ञानाचा वापरकर्ता नव्हे तर निर्माता बनेल!' बारामतीत अदानींनी फुंकले AIचे रणशिंग!
Gautam Adani Inaugurates AI Centre in baramati : "भारत आपल्या तांत्रिक प्रवासाच्या अशा टप्प्यावर उभा आहे, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केवळ प्रगतीचे साधन नसून आर्थिक वाढ आणि राष्ट्रीय क्षमतेचा मुख्य आधार ठरेल. भारतीय तरुणांनी स्वतःला केवळ एआयचे 'युझर्स' म्हणून न पाहता, जागतिक स्तरावर 'बुद्धिमत्तेचे निर्माते' म्हणून सिद्ध करावे," असे आवाहन अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केले.
महाराष्ट्रातील बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI CoE) च्या शानदार उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारताच्या डिजिटल भविष्याचा रोडमॅप मांडला.

मानवी प्रगतीतील पुढील मोठी झेप: AI
अदानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची तुलना ऐतिहासिक औद्योगिक क्रांती आणि डिजिटल क्रांतीशी केली. ते म्हणाले की, "ज्याप्रमाणे यंत्रसामग्री आणि इंटरनेटने जगाचा चेहरामोहरा बदलला, तशीच एआय ही मानवी प्रगतीतील पुढील मोठी झेप आहे. मात्र, एआयमध्ये अधिक 'समावेशकता' आहे; ती सामान्य नागरिकांच्या हातात थेट उत्पादकता आणि निर्णय घेण्याची शक्ती प्रदान करेल."
A privilege to inaugurate the Vidya Pratishthan Sharadchandra Pawar Centre of Excellence in AI at Baramati. Grateful for the gracious welcome by Shri Sharad Pawar ji, Dy CM Ajit Pawar ji, MP Supriya Sule ji, and MP Sunetra Pawar ji.
— Gautam Adani (@gautam_adani) December 28, 2025
Truly inspiring to see the AI labs and witness… pic.twitter.com/9VlyU2xcp2
भारताचा डिजिटल पाया: UPI ते AI पर्यंत
भारताने आधार, जन धन, UPI आणि व्यापक मोबाइल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आधीच जगात आपली डिजिटल ताकद सिद्ध केली आहे. अदानी म्हणाले की, AI हा आता पायाभूत सुविधांचा पुढचा स्तर (Next Infrastructure Layer) बनेल. शेतकरी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, छोटे उद्योजक जोखीम व्यवस्थापनासाठी आणि गृहिणी जागतिक संधी शोधण्यासाठी एआयचा वापर करतील. आता यशाची व्याख्या तुमच्या पार्श्वभूमीवर नाही, तर तुमच्यातील 'प्रतिभा' आणि 'बदल स्वीकारण्याच्या वृत्ती'वर अवलंबून असेल.
'स्वदेशी' AI काळाची गरज
भाषणाचा मुख्य भर हा भारताच्या 'धोरणात्मक स्वायत्ततेवर' होता. अदानी यांनी धोक्याची सूचना देताना सांगितले की, "जर आपण परदेशी अल्गोरिदम आणि प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहिलो, तर ते दीर्घकालीन धोक्याचे ठरू शकते. भारताचा डेटा, संगणकीय पायाभूत सुविधा (Compute Infrastructure) आणि एआय मॉडेल्स हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आणि राष्ट्रीय हिताशी जोडलेले असावेत."
शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स: संशोधनाचा नवा सेतू
विद्या प्रतिष्ठान अंतर्गत २५ कोटी रुपयांच्या योगदानातून उभारलेले हे केंद्र उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी सांधण्याचे काम करेल. कृषी, आरोग्यसेवा, प्रशासन आणि प्रगत उद्योग. केवळ निरीक्षण करणे नव्हे, तर 'निर्मिती' करणे. येथे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि संशोधनाची संधी मिळेल.
पायाभूत सुविधा आणि ऊर्जा : एआयचा कणा
एआय चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्स आणि विजेची गरज असते. अदानी यांनी स्पष्ट केले की, आधुनिक अर्थव्यवस्थेत 'डेटा सेंटर्स' हे बंदरे आणि महामार्गांइतकेच महत्त्वाचे आहेत. यासाठी अदानी समूह शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जेचा पुरवठा करून या डिजिटल इकोसिस्टमला बळकट करण्यास बांधील आहे, असे ते म्हणाले.
तरुणांना संदेश: 'समर्थ' व्हा!
भाषणाचा समारोप करताना त्यांनी भारतीय तरुणांना एक मंत्र दिला तो म्हणजे 'समर्थ', "स्वतंत्रपणे विचार करा, धैर्याने नवनिर्मिती करा आणि राष्ट्राचे भविष्य घडवा. एआयचे हे युग तुमचे आहे. तुम्ही केवळ इतिहासाचे साक्षीदार बनू नका, तर तो इतिहास स्वतःच्या हाताने लिहा."












Click it and Unblock the Notifications