वीजेचा शॉक लागून 4 शेतकरी ठार, ऐन गणेशोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील गणेशपूर-चिंचखेड गावावर शोककळा
Chandrapur Electric Shock News, 4 farmers died : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतात पडलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावात घडली आहे. गौरी-गणपतीच्या काळात ही धक्कादायक घटना घडल्याने मेंडकी गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावाच्या परिसरात शेतकरी शेतीकामासाठी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे गेले होते. शेतात पडलेल्या वीजेच्या तारांना त्यांचा स्पर्श झाल्याने यात चार शेतकऱ्यांचा मृ्त्यू झाला आहे. तर दोन शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ही घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तर या घटनेत पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत या चार शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. मृतांपैकी 3 शेतकरी गणेशपूरचे आहेत, तर एक शेतकरी चिचखेड येथील रहिवासी आहे.

नेमकी घटना कशामुळे घडली?
सदर घटना घडल्यानंतर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या वीजवाहक तारांमुळे ही घटना घडली असावी, असा दावा केला जात आहे. तर महावितरणच्या तारा शेतात पडल्याच कशा यासंबंधी चर्चा देखील होत आहे.
पावसामुळे तारा पडल्या होत्या का?
दोन दिवसांपूर्वी या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत वाहक तारा शेतात पडल्या होत्या. त्या तशाच राहिल्यामुळे ही दुर्घटना घडली असा दावाही या प्रकरणी केला जात आहे. पण वीज केंद्राचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी देखील केली.












Click it and Unblock the Notifications