एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय: सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी?
मुंबई: आगामी राजकीय समीकरणे आणि नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल पाहता, शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. 'भाकरी फिरवण्याची' वेळ आली असल्याचे संकेत देत शिंदेंनी सुमार कामगिरी करणाऱ्या ३ ते ४ मंत्र्यांचे कान टोचले आहेत.
लोकसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या मंत्र्यांना आपल्या मतदारसंघात किंवा सोपवलेल्या जबाबदारीत अपेक्षित यश मिळवता आले नाही, त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले असून त्यांच्या जागी नव्या आणि कार्यक्षम चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कामगिरीचा 'लिटमस टेस्ट' आणि मंत्र्यांची गच्छंती
निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री शिंदेंनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या कामाचा अहवाल आणि कामगिरी सुधारण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना पक्षाची ताकद वाढवण्यात अपयश आले आहे.
जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका ही या मंत्र्यांसाठी एक प्रकारे 'लिटमस टेस्ट' होती. मात्र, पक्ष अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने आणि अपेक्षित जागा निवडून न आल्याने एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आता अकार्यक्षम मंत्र्यांना संघटनात्मक बांधणीच्या कामात लावून, आक्रमक आणि तरुण चेहऱ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकली जाऊ शकते.
मुंबईतील अपयशाची कारणमीमांसा आणि घराणेशाहीवर प्रश्नचिन्ह
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला बसलेल्या फटक्याची पक्षात गंभीर चर्चा सुरू आहे. जागावाटपाच्या वेळी भाजपने मेरिटच्या आधारे चर्चा करून केवळ ९० जागा शिवसेनेला दिल्या होत्या, मात्र या जागांवरही पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
विशेषतः घराणेशाहीला प्राधान्य देऊन ज्या आमदारांच्या आणि खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात आले, त्यापैकी बहुतेकांना पराभवाचा सामना करावा लागला. सदा सरवणकर, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, अशोक पाटील आणि मंगेश कुडाळकर यांच्या नातेवाईकांच्या पराभवामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. "नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्यांना संधी का दिली नाही?" असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पक्षबांधणीसाठी 'मिशन मोड'वर काम करण्याचे आदेश
निवडणुकीतील त्रुटी शोधण्यासाठी आणि संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना राज्यव्यापी दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. आपण कुठे कमी पडलो आणि पराभवाची नेमकी कारणे काय, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
युतीच्या राजकारणात कल्याण-डोंबिवली आणि ठाणे या पट्ट्यातच उपमुख्यमंत्र्यांची शक्ती अधिक खर्च झाल्याने मुंबईकडे दुर्लक्ष झाले, असेही विश्लेषण राजकीय वर्तुळात केले जात आहे. आगामी काळात ही उणीव भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे आता पक्षात फेरबदल करून नव्या जोमाने मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
-
VerSe Innovation चा नफा आणि AI-आधारित वाढीकडे कल, भविष्यात IPO चे नियोजन -
VerSe Innovation चा नफा आणि AI-आधारित वाढीकडे कल, भविष्यात IPO चे नियोजन -
साताऱ्यात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, पण खुर्ची धोक्यात? जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रमाणपत्रच 'बोगस'? -
मोठी बातमी ! अनेक वर्षांचा दुष्काळ संपणार! इराणकडून भारताला सर्वात मोठी ऑफर -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications