'महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार; 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा!
Maharashtra politics news : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर आणि त्यांच्या दिल्लीवारीवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी हा दावा केला. त्यांच्या मते, महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आपला पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करण्याचा स्पष्ट आदेश मोदी आणि शाह यांच्याकडून मिळाला आहे, असा खळबळजनक दावा केलाय.

पक्ष-चिन्हाच्या सुनावणीपूर्वी 'शिंदेंची' दिल्लीवारी
संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्यांवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, "जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा त्यांचे (शिंदे गटाचे) पाय लटपटतात आणि ते दिल्लीत जातात."
राऊत यांच्या मते, या नेत्यांच्या दिल्लीवारीमागे कोणताही ठोस राजकीय किंवा विकासाचा अजेंडा नसतो. ते पुढे म्हणाले की, "कधी अमित शाहांना भेटतात तर कधी मोदींना भेटतात. बाकी त्याच्यामध्ये काहीही नाही. ते रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात."
शनिवारी (दि. २५) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.
मोदी-शहा यांचा शिंदेंना थेट आदेश
संजय राऊत यांनी सर्वात मोठा आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे शीर्ष नेतृत्व, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, यांनी एकनाथ शिंदे यांना स्पष्ट आदेश दिला आहे की, महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल.
राऊत यांनी दावा केला की, "मोदी आणि शाह यांना माहित आहे की, शिंदेंची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे. त्यांनी त्यांना महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विरुद्ध वापरून घेतले आहे." निवडणुकीनंतर त्यांना 'तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल,' असा थेट सल्ला/आदेश असल्याचा दावा राऊत यांनी केला.
प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व राज्याबाहेर का?
राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर टीका करताना प्रादेशिक पक्षाच्या भूमिकेवर आणि संरचनेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, "एकनाथ शिंदेंना त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते. जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनावर त्यांना यावं लागायचं. प्रादेशिक पक्षाची व्याख्या: राऊत यांनी स्पष्ट केले की, शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे.
नेतृत्व आणि कार्यालय
प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व राज्यांमध्येच असते आणि त्यांची मुख्य कार्यालयेही राज्यातच असतात, ती दिल्लीत नसतात. त्यांनी आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे उदाहरण दिले की, ते आपल्या पक्षाचे काम घेऊन दिल्लीत जात नाहीत.
शिंदे गटावर टीका
राऊत यांनी टोला लगावला की, शिंदे गटाने चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. आता यांचे मालक दिल्लीत असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागतं."
सुप्रीम कोर्टातील लढाई आणि जनतेचा विश्वास
शेवटी, सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि चिन्हाच्या कायदेशीर लढाईबद्दल बोलताना राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, कोणत्याही कायद्याच्या आधारे शिंदे गट सुप्रीम कोर्टात आपला बचाव करू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे.
राऊत यांनी धोक्याचा इशारा देत म्हटले की, तसा शिंदे गटाला वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल.












Click it and Unblock the Notifications