महायुतीत पुन्हा धूसफूस?; एकनाथ शिंदे गेले गावी, 'त्या' दोन पालकमंत्रीपदावरुन रंगणार महाभारत
पालकमंत्रिपदाची यादी शनिवारी जाहीर झाली. त्यात राज्यातील पालकमंत्री जाहीर करण्यात आले. मात्र शिवसेनेच्या दोन नेत्यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारज झाल्याचे सांगितले जातेय. याच नाराजीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मुळ गावी निघून गेल्याचे समजते.

शिंदे गेले आपल्या गावी
यापूर्वी शपथविधीच्या वेळी एकनाथ शिंदे नाराज झाले होते. त्यावेळीही ते आपल्या दरे या मुळ गावी गेले होते. आता एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या गावी गेले आहेत. महायुतीतील धुसफूस यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. काल पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली. त्यात शिंदेंच्या जवळच्या दोन माणसांना सांगूनही स्थान न मिळाल्यामुळे शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
'त्या' दोघांना डावलले
पालकमंत्रिपदाच्या यादीत शिंदेच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या भरत गोगावले व दादा भुसे यांना डावलण्यात आले आहे. या दोघांनाही पालकमंत्रिपदे द्यावीत, अशी एकनाथ शिंदे यांची मागणी होती. मात्र या मागणीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकूणच महायुतीने दुर्लक्ष केल्याच्या चर्चा आहेत. या दोघांच्या पालकमंत्रीपदासाठीच शिंदे आग्रही होते. मात्र त्यांच्या मनासारखे न झाल्याने ते नाराज आहेत, असे समजते.
'त्या' दोघांसह मुंडेंनाही धक्का
शिवेसना शिंदे गटाचे भरत गोगावले व दादा भुसे यांना पालकमंत्रीपदाबाबत डावलण्यात आले आहे. अजित पवार गटाकडूनही मंत्री धनंजय मुंडे यांना डावलण्यात आले आहे. हे सर्व नेते आपापल्या वरिष्ठांवर नाराज आहेत. या सर्वांची नाराजी कशी काढायची, हे नेत्यांना सध्यातरी समजत नाही. मुंडे यांच्यावर सध्या आरोप होत असल्याने त्यांचे पद डावलण्याला कारण आहे, मात्र गोगावले व भुसे यांच्याबाबत महायुतीकडे कारण नसल्यानेच शिंदे नाराज झाल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications