"एक रहेंगे, सेफ रहेंगे" : भाजपचा नवा नारा
Ek hai to safe hai BJPs new slogan : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतांचे प्रचंड ध्रुवीकरण झाले. "संविधान बचाव" चा नारा घेऊन लढणाऱ्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. "भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आले तर संविधान बदलले जाणार, आरक्षण संपविले जाणार" असा प्रचार नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला. आणि विशेषतः महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात त्याचे परिणाम दिसून आले.
महाराष्ट्रात ध्रुवीकरणाचे हे प्रमाण प्रचंड होते. तब्बल दहा मतदारसंघात महायुतीच्या जागा पाच ते दहा हजाराच्या फरकाने पडल्या. एका लोकसभा मतदारसंघात साधारणपणे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असतो. पाच पाच विधानसभा मतदारसंघात आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार फक्त एका मतदारसंघात झालेल्या नकारात्मक मतदारामुळे पराभूत झाले, धुळे, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई ही त्याची उदाहरणे आहेत. फक्त एका मुस्लिम बहुल मतदार संघात झालेल्या मतदानाने निवडणुकीचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले आणि महायुतीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. यापासून धडा घेऊन भाजपने सावध पावले उचलली आहेत.

कमी जागांमुळे भाजपची अडचण
भाजपच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने पाचशे वर्षे रखडलेला राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला. न्यायालयातून निर्णय मंदिराच्या बाजूने लागला आणि भव्य मंदिराचे निर्माण देखील करण्यात आले.. अयोध्येच्या राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापना पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला कलम 370 चा प्रश्न मिटवण्यात आला. ट्रिपल तलाक सारखी जुलमी पद्धत मोदी सरकारने बंद केली. या सगळ्या निर्णयामुळे बिथरलेल्या अल्पसंख्याक समुदायाने भाजपच्या विरोधात मतदान केले. आणि 400 जागा जिंकण्याचा मनसुबा राखून असलेल्या भाजपला अवघ्या 240 जागांवर समाधान मानावे लागले. अर्थात मित्र पक्षांच्या सहाय्याने भाजप बहुमतात आलेली असली तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपला माघार घ्यावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे
वक्फ सुधारणा विधेयक हा सध्या देशभरात गाजत असलेला मुद्दा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, समाजवादी पार्टी या सर्वांनी या विधेयकाला विरोध केला आहे. सध्या हे विधेयक सखोल चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत असते आणि वैचारिक मित्र असलेल्या पक्षांना समाधानकारक जागा मिळाल्या असत्या तर हे विधेयक संसदेत संमत करता आले असते. परंतु हे विधेयक आकड्यात फसले आणि संयुक्त संसदीय समितीकडे गेले. त्यामुळे एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर ठोस निर्णय घेण्यात भाजपाला अपयश आले. त्यामुळे विरोधकांकडून जातीपातीच्या मुद्द्यावर हिंदू समाजातत विभाजन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे भाजप जनतेला समजावून सांगत आहे.
अयोध्येतच भाजपचा पराभव
लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभरात विरोधकांनी अनेक मुद्द्यावरून वातावरण तापवले होते. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा असो किंवा हरियाणा मधील महिला कुस्तीगिरांच्या अपमानाचा. काँग्रेसने भाजपला पद्धतशीरपणे गुंतवून ठेवले होते. हाथरसमध्ये झालेल्या दलित अत्याचाराचा घटनेवरून देखील उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ यांना चांगलेच घेरण्यात आले. दुसरीकडे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी युती केल्यामुळे यादव आणि मुस्लिम अशी मोट राहुल गांधी यांना बांधता आली. आणि चक्क अयोध्येत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. जिथे राम मंदिर उभे राहिले तिथेच भाजपचा उमेदवाराचा पराभव होणे ही बाब गंभीर होती.
या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन भाजपने पद्धतशीरपणे खेळी करण्यास सुरुवात केली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. त्याच्या बरोबरीनेच जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका देखील पार पडल्या. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान भाजपची बदललेली रणनीती प्रकर्षाने नजरेत आली.
बांगलादेशमधील अडचण
भारतातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर किंवा त्याच्या आसपास बांगलादेशमध्ये मोठा उठाव झाला. रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी लोकनियुक्त सरकार उलथून टाकले आणि तेथील पंतप्रधानांना अन्य देशात शरणागती पत्करणे भाग पडले. या आंदोलनात सर्वाधिक वाताहत झाली ती बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समुदायाची. तेथील बहुसंख्याकांनी हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले आणि त्यांना घरेदारी सोडणे भाग पडले.
योगी आदित्यनाथ यांनी उचलला मुद्दा
हाच मुद्दा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित केला. "बटेंगे तो कटेंगे" म्हणजेच "विभागलो गेलो तर मारले जाऊ" हे आदित्यनाथ यांनी ठासून सांगितले. बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर ओढवलेल्या संकटाची पार्श्वभूमी त्यांच्या विधानाला होती. त्यांच्या या विधानाला हरियाणा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि हरियाणात जवळपास हरलेली भाजपा पुन्हा एकदा विक्रमी बहुमताने निवडून आली.
"एक रहेंगे तो सेफ रहेंगे"
एक गठ्ठा मतदानाचा मोठा फटका महाराष्ट्रात देखील महायुतीला बसला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यात जागा कमी झाल्यामुळे भाजपचे बहुमत हुकले आणि भाजपला आपली विचारधारा राबवणे कठीण झाले. म्हणूनच महाराष्ट्रातही एकत्र रहा हा संदेश हिंदू मतदारांमध्ये दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सभेत "एक रहेंगे तो सेफ रहेंगे" असा नारा दिला आहे. आणि आता तो घरोघरी पोहोचवला जात आहे.
जिथे जिथे हिंदू विभागले गेले तिथे त्यांच्यावर संकट ओढवले, हे पटवून देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. जम्मू-काश्मीर मधून विस्थापित झालेले कश्मीरी पंडित, बांगलादेश मधून विस्थापित झालेले हिंदू,. पाकिस्तान मधून विस्थापित झालेले शीख आणि हिंदू यांची आठवण भाजप मतदारांना करून देत आहे. एक गठ्ठा मतदान करून आपल्या मागण्या पदरात पाडून घेणाऱ्यांना त्याच पद्धतीने उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आपला संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यात भाजप यशस्वी होत आहे, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications