महायुतीत वादाची ठिणगी, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आता सर्व पक्ष कामाला लागले आहे. त्याचे राज्यभर दौरे सुरु आहेत. मागील काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभर जन सन्मान यात्रा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतील तीन ही पक्ष एकत्र लढणार असून त्याच्यात लवकरच जागा वाटप होणार आहे. पण आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
एका कार्यक्रमात मंत्री तानाजी सांवत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यानंतर उलट्या होतात, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर आता महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून पडण्याचं आवाहन केलं आहे.
काय म्हणाले तानाजी सावंत ?
एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सांवत म्हणाले की, "काँग्रेस, राष्ट्रवादीचं आणि माझं कधी जमलेलं नाही. हे वास्तव आहे. कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला मांडी लाऊन एकत्र बसलो असलो तरी सुध्दया बाहेर आलो की आम्हाला उलट्या होतात. ही वस्तूस्थिती आहे. सहन होत नाही. ते आता वयाच्या 60 व्या वर्षी माणूस बोलू शकत नाही", असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.

नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू- उमेश पाटील
तानाजी सावंत याचं हे विधान समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश यांनी प्रतिक्रया दिली आहे. 'तानाजी सावंत हे बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तुंग कामगिरी केलेले व्यक्तीमत्व आहे. शुन्यातून विश्व निर्माण केल्याचा व्यक्ती म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटायचा. पण त्यांची अशी ही वक्तव्ये ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाट वाटते. ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही.
माझी त्यामुळे माझ्या वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, आपण स्वाभिमानी आहोत. आपण काही कुणाच्या घरचं खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू' असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
तानाजी सावंत या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, मिटकरी म्हणाले की, तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील.
तानाजी सांवत यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून ही प्रतिक्रिया आली आहे. भरत गोगावले म्हणाले की, "तानाजी सावंत कोणत्या अर्थाने बोलले ते आम्हाला विचारावं लागेल. आपण तिघांनी पुढे एकत्र लढायचं आहे. त्यातून आरोग्य मंत्री यांना उलट्या येत असतील तर ते स्वत: आरोग्य मंत्री आहेत. त्यांनी त्याचं औषध घ्यावं. आरोग्य मंत्र्यांनी असं चुकीचं वक्तव्य करु नये. हे चुकीचं आहे. त्यांना जमत नसेल तर त्यांनी गप्प बसावं. कुणाला उल्टी येत असेल, ताप येत असेल, त्यांनी असं वक्तव्य करु नये, याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करु", असं गोगावले म्हणाले आहेत.












Click it and Unblock the Notifications