कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि हजारोंपेक्षा जास्त लाभार्थी, धाराशिवमध्ये 'महायुती'चे पारडे जड
Dharashiv election : धाराशीव विधानसभेत अर्जमाघारीनंतर आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले आहेत. मात्र मुख्य लढत शिवसेनेच्या दोन्ही गटांतच होणार आहे. शेवटच्या दिवशी बंडखोरांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले आहे. आता या मतदारसंघात शिवसेनेचे अजित पिंगळे व ठाकरे गटाचे उमेदवार आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महायुती सरकारच्या विकासकामांच्या जोरावर यावेळी आमदार घाडगे यांना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे इच्छुक होते. परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला. याशिवाय महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाचे डाॅ. प्रतापसिंह पाटील, संजय निंबाळकर यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनाही ऐनवेळी आपले अर्ज मागे घ्यावे लागले.

अजित पिंगळे यांचे पारडे जड
या मतदारसंघात शिवसेनेचे सुरज साळुंके, सुधीर पाटील व शिवाजी कापसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र महायुतीकडून त्यांची समजूत काढण्यात यश आले. अखे या तिघांनीही आपले अर्ज मागे घेत अजित पिंगळे यांना जाहीर पाठींबा दिला. आता पिंगळे यांच्या प्रचारात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व रिपब्लिकन पार्टीही प्रत्यक्ष मैदानात उतरली आहे. सर्व पक्ष एकत्रित अजित पिंगळे यांचा प्रचार करत असल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी सभा
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी धाराशिवसह जिल्ह्यात तीन ठिकाणी सभा होत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, तुळजापूरचे उमेदवार राणा जगजितसिंग, धाराशिवचे उमेदवार अजित पिंगळे यांनी या सभेचे नियोजन पूर्ण केले आहे. या सभेत मुख्यमंत्री फक्त विकासावर बोलणार आहेत. महायुतीने आत्तापर्यंत धाराशिवसह जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा ते मतदारांसमोर मांडणार आहेत. लाडकी बहिण योजनेप्रमाणे इतर योजनांना धाराशिवमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचे पारडे जड समजले जात आहे.
पिंगळे यांच्या उमेदवारीने महायुतीत एकसंघ
अजित पिंगळे यांनी पूर्वी शिवसैनिक म्हणून काम केले आहे. मध्यंतरी त्यांनी भाजपमध्ये जात विकासकामे सुरु ठेवली. त्याकाळात आ. राणा जगजितसिंह यांच्याशी त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले. पूर्वीचे शिवसैनिक असल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी व पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शिवाय कळंब तालुक्यात त्यांना यापूर्वीही मोठे मताधिक्य मिळालेले आहे. पिंगळे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील तिन्ही पक्ष त्यांचे एकसंघपणे काम करणार असल्याने त्यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत.
धाराशिव पाणी योजना ठरणार गेमचेंजर
धाराशिव शहराची लोकसंख्या पाहता येथे पाण्याची कायम अडचण असते. शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. हे पाहता महायुती सरकारने अमृत-2 योजनेअंतर्गत रुईभर व तेरणा धरणातून नव्याने या तालुक्याला पाणीपुरवठा करण्याची योजना आखली आहे. शहराला दररोज 54 एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी 230 कोटींच्या निधीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे धाराशिवकरांची तहान भागणार आहे. हा मुद्दा शिवसेनेच्या उमेदवारासाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुसंपादनानंतर रेल्वेमार्गासाठी सरकारचा निधी
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोलापूर ते उस्मानाबाद हा 84 किलोमिटरचा रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी सरकार सध्या प्रयत्नशिल आहे. 2027 पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल. सरकारने त्यासाठी 905 कोटींचा निधी दिला आहे. हा प्रकल्प महायुतीसाठी महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत धाराशिवच्या विकासासाठी महायुती सरकारने दिलेला निधीच पिंगळे यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे.
रस्ते व नालीबांधकामासाठी 140 कोटींचा निधी
धाराशिव शहरातील रस्ते व नाली बांधकामासाठी 140 कोटींचा निधी महायुती सरकारने मंजूर केला. या निधीमुळे धाराशिव शहरातील रस्ते चकाचक होणार असून सांडपाण्याचीही व्यवस्था होणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने धाराशिवसाठी 140 कोटी तर नळदूर्गसाठी 97 कोटींचा निधी दिला. सरकारकडे 173 कोटींची मागणी करण्यात आली आहे. उर्वरीत निधीही लवकरच मिळून त्यातून धाराशिवचा चेहरामोहरा बदलणार आहे. हा मुद्दाही येत्या निवडणुकीत चर्चेत आला असून, त्यातून महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड समजले जात आहे.
कळंब शहरासाठीही 70 कोटींचा निधी
धाराशिव येथील नवीन बसस्थानक, कळंब नगरपरिषद पाणीपुरवठ्यासाठी 70 कोटी, धाराशिव येथे नवीन 500 बेडचे अद्यायावत रुग्णालय आदींना महायुती सरकारने भरघोस निधी दिला. धाराशिव व कळंबच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागला. हे सगळे मुद्दे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अजित पिंगळे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. महायुतीची विकासकामे आणि धाराशिव जिल्ह्यातील सरकारी योजनेचे हजारो लाभार्थी यांच्या जोरावर सध्या पिंगळे यांचेच पारडे जड समजले जात आहे.












Click it and Unblock the Notifications