शिंदेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी फडणवीसांनी डाव रचला;नमो नावाच्या 10 योजना बंद;दैवत बदल अन् ...
Devendra Fadnavis vs Eknath Shinde : राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजनांवर बंदी आणल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
विशेषतः, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने 'नमो' शिर्षकाखाली सुरू असलेल्या तब्बल १० महत्त्वाकांक्षी योजना बंद केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दानवे यांनी या निर्णयावर थेट 'दैवत बदलण्याच्या' अटीवर चिन्ह आणि नाव मिळाल्याची बोचरी टीका करत शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.

'नमो' नावाच्या १० योजनांवर बंदीची कुऱ्हाड
अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या 'नमो' नावाने सुरू होणाऱ्या दहा योजना बंद केल्या आहेत.
या योजनांमध्ये खालील प्रमुख योजनांचा समावेश आहे, ज्या शिंदे यांनी 'मोदी' ब्रँड वापरून राज्यात मोठा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता:
नमो महिला सशक्तीकरण योजना, नमो कामगार कल्याण योजना, नमो शेततळे अभियान, नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना, नमो शहर सौंदर्यीकरण योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना. या दहा योजना एकाच वेळी 'नमो' नावाच्या एवढ्या मोठ्या योजनांना स्थगिती दिल्याने, 'शिंदे गट' भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केवळ नावापुरता आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दानवेंची बोचरी टीका: 'दैवत बदलण्याची अट'
या योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. दानवे यांच्या मते, शिंदे गटाला 'महाशक्ती'ने अर्थात भाजपने बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते.
आर्थिक भार की राजकीय वर्चस्वाची लढाई?
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या काही योजना यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत, ज्यात 'आनंदाचा शिधा' यासह इतर योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजना'मुळे सरकारच्या तिजोरीवर आलेल्या आर्थिक भारामुळे या योजना बंद केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मात्र, 'नमो' योजना बंद करण्याच्या निर्णयामागे केवळ आर्थिक कारण आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'शिंदे मॉडेल'ला राज्यात वर्चस्व मिळू नये यासाठी राजकीय धोरण म्हणून हे निर्णय घेतले, अशी शंका उपस्थित होत आहे. हा निर्णय महायुतीमधील 'देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे' या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा भाग असल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. यावर 'कटप्रमुख' असलेले शिंदे मात्र गप्प राहून 'महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना' दिसतील, अशी टीका दानवे यांनी केली आहे.
'शिंदेंच्या योजना बंद, पण 'देवाभाऊ'चे सरकार चालू'
एकंदरीत परिस्थितीवर भाष्य करताना दानवे यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे की, "शिंदेंच्या काळातील योजना बंद, शिंदेंनी दिलेले पक्षाचे ऑफिस बंद, देवाभाऊचे सरकार मात्र चालू." हे 'चालू' सरकार निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.












Click it and Unblock the Notifications