राहुल गांधींच्या परभणी भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- त्यांचा हेतू हा...
परभणी येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस ठाण्यात मृत्यू झाला. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी परभणी जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल चढवत फडणवीस यांना दोषी असल्याचे म्हटले. तर सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांवर केला. या भेटीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधींची भेट म्हणजे केवळ राजकीय हेतू साध्य करणे
राहुल गांधी यांनी परभणी येथे दिलेल्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यामुळे मला असे वाटते की त्यांचे जे विद्वेषाचे काम त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केले आहे.

आमचे सरकार संवेदनशील, न्यायालयीन चौकशी लावली
आमचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. यात सगळे समोर येईल, तसेच कुठल्याही आरोपीला सोडण्यात येणार नसल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिस तसेच मुख्यमंत्री जबाबदार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.
छगन भुजबळ महायुतीचे ज्येष्ठ नेते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविषयी विधान करताना म्हणाले की आम्ही सगळे त्यांचा सन्मान करतो. मंत्रिमंडळात घेण्यात आले नाही तेव्हा आमच्या मनात त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार होता, तसेच भुजबळांसारखे नेते आमच्या सोबत असलेच पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
20 लाख घरे देण्याची केंद्राची घोषणा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या वर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडे सहा लाख घरे मंजुर करण्यात आली होती आता ते टार्गेट वाढवण्यात आले आहे. अतिरिक्त 13 लाख घरे आपल्याला देण्यात आली आहेत.
एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी, बेघरांसाठी तसेच कच्च्या घरात राहणाऱ्यांसाठी एका वर्षात 20 लाख घरे देण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी केली आहे.
मोदींनी महाराष्ट्राला मोठी भेट दिली
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे. तसेच देशाच्या इतिहासात कुठल्याच राज्यात एका वर्षात एवढी घरे मिळालेली नाहीत. आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे की ज्यांची नावे सुटली होती त्यांना नव्या सर्वेक्षणात घेण्यात येणार आहे. असा निर्णय माननीय मोदी यांनी केला आहे. आणि हा संकल्प शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितला आहे.












Click it and Unblock the Notifications