जोपर्यंत 'देवा भाऊ' मुख्यमंत्री, तोपर्यंत लाडकी बहीण!,फडणवीसांची डरकाळी;'लखपती दीदीं'साठी नवा प्लॅन!
Devendra fadnavis on ladki bahin yojana : महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक इशारा देत महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. "लोक म्हणत होते निवडणुका झाल्या की ही योजना बंद होईल, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा हा देवा भाऊ मुख्यमंत्री पदावर आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही," अशा शब्दांत त्यांनी बहिणींना आश्वस्त केले. परभणी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

केवळ लाडकी बहीण नाही, आता 'लखपती दीदी' बनवणार!
सभेला उपस्थित असलेल्या हजारो महिलांच्या जनसमुदायाला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा केवळ सुरुवात आहे. सरकारचे पुढचे पाऊल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आहे. "मला माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी म्हणून ठेवायचे नाही, तर त्यांना 'लखपती दीदी' बनवायचे आहे," असे उद्दिष्ट त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यातील लखपती दीदींचा प्रवास
आतापर्यंतची स्थिती : महाराष्ट्रात आतापर्यंत ५० लाख महिला 'लखपती दीदी' झाल्या आहेत.
परभणीचे योगदान : परभणीतून मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी १ लाख लखपती दीदी तयार केल्याचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
पुढील लक्ष्य : या वर्षाअखेरीस राज्यात १ कोटी लखपती दीदी करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.
महापालिकेचे रणशिंग: महापौरांना दिला 'टारगेट'
परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा संदर्भ देत फडणवीस यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. ते म्हणाले, "जेव्हा या महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल, त्याच्या बरोबर एक वर्षानंतर मी स्वतः कामाचा आढावा घ्यायला येईल. त्यावेळी रस्ते आणि पाणी यांसोबतच, माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती केले, हा माझा पहिला प्रश्न असेल."
विकासाच्या आड येणाऱ्यांना नेस्तनाबूत करू"
परभणीच्या विकासावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर कडक प्रहार केला. "आई प्रभादेवीच्या या नगरीत जो कोणी विकासाच्या कामात अडथळा आणेल किंवा आडवा येईल, त्याला त्याच ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही," असा सज्जड दम त्यांनी भरला.
"इतिहास सन्मानाचा, पण भविष्य घडवण्याची हीच वेळ"
राजकारणात वारंवार जुन्या इतिहासाचा संदर्भ देणाऱ्यांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले, "आपण किती काळ केवळ इतिहासात जगणार आहोत? इतिहास लक्षात ठेवायचा असतो, त्याचा सन्मान करायचा असतो, पण भविष्य कोरणे हे आपल्या हातात आहे. इतिहासात जगणारे इतिहासातच मरतात, त्यामुळे आता परभणीचे उज्ज्वल भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे."












Click it and Unblock the Notifications