"उद्धव ठाकरेंच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचताहेत त्यांचा जनाधार संपला"- देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis' big statement : भाजपचा पदाधिकारी मेळावा आज मुंबईत सुरु आहे.या मेळाव्यात भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांचं एक वक्तव्य आता चर्चेत येत आहे. येत्या निवडणुकीत अति आत्मविश्वास ठेवू नका आणि गाफीलही राहू नका कारण उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपला मराठी आणि हिंदू मतं आता त्यांच्यासोबत नाही. त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
मुंबईत आज अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यासाठी दुपारी अमित शहा यांनीही हजेरी लावली. मेळाव्यात मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ आणि विजयाचा आत्मविश्वास दिला.

नेमकं काय म्हणाले फडणवीस ?
देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि कानमंत्र दिला ते म्हणाले, "आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका किंवा गाफील राहू नका, सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. राज्यातील 3 कोटींपेक्षा जास्त जनता ही सरकारी योजनांची लाभार्थी आहे. त्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti) पु्न्हा येईल"
उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी आणि हिंदू मतं आता त्यांच्यासोबत नाही. त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. त्यामुळं आता हे मतं आपल्याकडं आहेत आणि राज्यात आपलेच सरकार येईल, अशी परिस्थिती आहे. पण अती आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका.
अमित शहांचा संवाद
दरम्यान, ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी मुंबईत पोहचले त्यांनी दादर येथील योगी सभागृहात मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. आपल्या या दौऱ्यात अमित शाह हे मुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातील भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
जागा वाटपावर शहा करणार चर्चा
या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील भाजपचे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित आहेत. मुंबईतील मेळाव्यानंतर अमित शाह हे नवी मुंबईतील ठाणे आणि कोकणातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.












Click it and Unblock the Notifications