शिवसेना एकत्र करण्याचा दावा भोवला? संजय शिरसाटांचा संजय राऊत होऊ नये, म्हणजे मिळवलं; महायुतीत जुंपली
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत असल्याचा दावा, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी केला. या दाव्यानंतर मात्र चांगलाच वाद उफाळला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्यांसह आता महायुतीतील सहकारी पक्षाचे नेत्यांनीही निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते शिरसाट?
शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, असा दावा त्यांनी केला होता. शिवाय उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याासठी मी प्रयत्न करु शकतो, असंही त्यांनी म्हटलं होतं. मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले होते, मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज आहे. त्यांनी (उद्धव ठाकरे) दोन पावलं मागे गेलं पाहिजे हे माझं मत आहे. ते जातील की नाही शक्यता कमी आहे. इतरांना जवळ करतील पण एकनाथ शिंदे आणि त्यांचं सूत जमेल असं सध्या तरी वाटत नाही. मी शिंदेंकडे जाऊ शकतो. त्यांना एकत्र येण्याबाबत बोलू शकतो. पण तुला हा शहाणपणा करण्याची गरज काय? असं शिंदे म्हणाले तर मला थांबावं लागेल, असं शिरसाट म्हणाले होते.
महायुतीत झाला वादंग
संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनीही शिरसाटांना शाब्दिक टोले लगावले. शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पक्षाची भूमिका आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतात. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यावेळी आम्ही पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिले. इतर कुणालाही अधिकार दिले नाहीत. त्यामुळे संजय शिरसाट काय म्हणतात, याला महायुतीत महत्त्व नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे.
नितेश राणे यांचाही प्रहार
संजय शिरसाट यांच्या विधानावरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीही तिखट समाचार घेतला. ते म्हणाले, दोन्ही शिवसेनेला एकत्र आणण्याचे प्रयत्न त्यांनी करत राहावे. परंतु, एकनाथ शिंदे यांचं काय मत आहे? अन्य आमदारांचं काय मत आहे? याचा विचार करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये हीच अपेक्षाच आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी शिरसाटांना चिमटा काढला.
संजय राऊतांचाही चिमटा
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही शिरसाटांना जोरदार चिमटा काढला. ते म्हणाले, संजय शिरसाट हे अटलबिहारी वाजपेयीच आहेत. महान माणूस आहे तो. त्यामुळे ते हे करू शकतात. त्यांच्या ज्या भावना आहेत, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ते काहीही करू शकतात. ते शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र आणतील. त्यांचे जे विचार आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications