वाद वाढणार..! निवडणूक आयोगाला 'श्वाना'ची उपमा; भाई जगतापांची जीभ घसरली, महायुतीचेही सडेतोड उत्तर...
विधानसभा निवडणुकीतील धक्क्यातून महाविकास आघाडी अजून सावरलेली दिसत नाही. मविआचे नेते निवडणूक आयोग व ईव्हीएमवर रोज बेछूट आरोप करताना दिसत आहेत. अशात काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी निवडणूक आयोगावर टिका करताना थेट श्वानाची उपमा दिल्याने वाढ वाढला आहे. जगतापांच्या या विधानानंतर भाजपनेही सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाले भाई जगताप?
निवडणुकीच्या निकालानंतर भाई जगताप यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, 'भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाहीवर जर काही प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावं लागेल. लोकशाही मजबूत करण्यासाठी जेवढ्या संस्था तयार करण्यात आल्या आहेत, त्या श्वान होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत.' असं वक्तव्य करत भाई जगताप यांनी नव्या वादाला आमंत्रण दिलं आहे. आता जगताप यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करतो, हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
भाजपनेही केला पलटवार
भाई जगताप यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'मला वाटतं, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यांचेच नेते रोज काही ना काही भुंकताना दिसत आहेत. त्यांच्या दृष्टीने त्यांना तसेच दिसणार. ज्याची जशी दृष्टी तसेच त्याला दिसते,' अशी खोचक प्रतिक्रिया दरेकरांनी जगतापांना दिली.
मविआला सपाटून मार
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मिळून फक्त 50 जागाच जिंकता आल्या. त्याऊलट महायुतीला मोठ यश संपादन केले. 132 जागांवर विजय मिळून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटला 41 जागा मिळाल्या. या निकालानंतर मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता जगताप यांच्या वक्तव्यानंतर निवडणूक आयोग काय उत्तर देतो, हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications