मै अकेलाही चला था... मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी करत फटकेबाजी
मुंबई: मुंबईत घेतल्या गेलेल्या महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. आता ताकही फुंकून प्यायचे आहे, म्हणत त्यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. या मेळाव्यात त्यांनी शेरोशायरी करत आगामी विधानसभा निवडणुकीत मरगळ झटकण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी जोमाने तयारी सुरु केली आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीत अवघ्या १७ जागा मिळवता आल्या. या सगळ्या घडामोडी पाहता कार्यकर्त्यांत जोश भरण्यासाठी मुंबईत महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये डबल इंजिन सरकार असताना महायुतीला मोठा फटका बसला.
राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महायुतीच्या मेळाव्यात अर्थातच या विषयाकडे गांभीर्याने पाहण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी मोलाचा सल्ला देत कार्यकर्त्यांचे कानही टोचले. एकदा मार पडला आहे. आता गाफील राहू नका. आता ताकही फुंकून प्यायचं आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.
एकनाथ शिंदेंची शेरोशायरी
"'मै अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मगर लोक साथ आते गये और कारवाँ बनता गया.' आपला कारवाँ आता मोठा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राने मोठा उठाव पाहिला. आम्ही धाडसी निर्णय घेऊन महायुतीचं सरकार आणलं. हे सरकार लोकांच्या भूमिकेतलं आहे, बाळासाहेबांच्या विचारांचं आहे. ५० आमदार बरोबर होते, त्यानंतर १३ खासदार आले. लाखो कार्यकर्ते आले. देवेंद्र फडणवीस यांची मला साथ लाभली." असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मनात जोश भरला.
महायुती हिच आपली ताकद
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सुरुवातीच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने स्टे देऊन सगळ्या गोष्टींना स्पीडब्रेकर टाकले होते. फक्त फेसबुक सुरु होतं. मात्र आपलं सरकार आल्यावर आनंदाचं वातावरण निर्माण झालं. राज्यात समृद्धी, आनंदाचं वातावरण तयार झालं. कारण महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा बंद होता कामा नये. राज्याचं वर्तमान आपण सुधारलं आहे आणि भविष्य सुधारण्याचा ध्यास घेतला आहे. इथे उपस्थित असलेले सगळेजण आपली ताकद आहे.
सुखी माणूस हेच आपलं स्वप्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपलं सरकार काम करणारं सरकार आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस रात्री उशिरापर्यंत काम करतो. अजित पवार हे सकाळी लवकर उठून काम करतात. हे सरकार २४ तास काम करणारं आहे. राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. पण सामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं कसं होईल या दृष्टीने आम्ही काम करतो आहोत.












Click it and Unblock the Notifications