ठाकरे म्हणजे मुंबई नाही, मराठी माणूस नाही; अर्णव खैरेच्या मृत्यूस तेच कारणीभूत;भाजपचा घणाघात!
BJP Attacks Thackeray Brothers : भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख असलेले ठाकरे बंधू, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अर्णव खैरे नावाच्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेला भाषिक द्वेषाचे कारण ठरवून, भाजपने या दोघांनाही या 'पापातून' सुटता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाषिक द्वेषाच्या राजकारणावर निशाणा
भाजपने ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावर चालवलेल्या 'भावनिक राजकारणा'वर आणि 'भाषिक द्वेषाच्या कारखान्या'वर कठोर शब्दांत टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मराठी माणसाने ठाकरे बंधूंना भरभरून प्रेम दिले, सत्ता दिली, सन्मान दिला... पण परत काय मिळाले? भकास मुंबई, आणि त्यांच्या स्वार्थी भावनिक राजकारणापायी निर्माण झालेला द्वेष."
उपाध्ये यांनी स्पष्ट दावा केला आहे की, "अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही. भाषिक द्वेषाचे जे कारखाने त्यांनी चालवले त्यातूनच हा मृत्यू घडला आहे." याचसोबत त्यांनी थेट आव्हान देत म्हटले आहे की, "ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही!"
काय आहे अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण?
- अर्णव खैरे हा कल्याण पूर्व येथील सहजीवन रेसिडेन्सीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो मुलुंड येथील केळकर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. तो नेहमीप्रमाणे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी कल्याणहून कॉलेजला जाण्यासाठी लोकलने निघाला. ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. या गर्दीत थोडी जागा मिळावी म्हणून त्याने हिंदीत केवळ 'थोडा आगे हो' एवढेच शब्द उच्चारले होते. त्याचवेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या 4-5 तरुणांनी त्याला वेढले व तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायला लाज वाटते का? असे प्रश्न करत मारहाण केली.
- अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अर्णव घाबरला. ठाणे स्टेशनला पोहोचताच तो लोकलमधून उतरला व पुढील लोकल पकडून मुलुंड स्थित आपल्या कॉलेजला पोहोचला. त्याने त्या दिवशी प्रॅक्टिकलला उपस्थिती लावली. पण मनातल्या भीतीमुळे व तणावामुळे तो कॉलेज अर्धवट सोडून घरी परतला.
- घरी जाताना त्याने वडिलांना फोन करून लोकलमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे तो मानसिकदृष्ट्या खूपच खचल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यानंतर सायंकाळी 7 च्या सुमारास त्याचे वडील घरी परतले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले.
- त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता अर्णवने आपल्या बेडरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने त्याला रुख्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी रात्री 9.05 वाजता त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर वडील जितेंद्र खैरे यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी वडिलांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू केला आहे.












Click it and Unblock the Notifications