भोकरदन मतदारसंघ दानवे मुक्त होणार का? यंदा विधानसभेची वाटही अवघड, 'मविआ'चे मोठे चॅलेंज
Bhokardan Assembly Constituency Election 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सलग पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकली, परंतु त्यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्याचे परिणाम होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भोकरदन मतदारसंघात होऊ शकतात. नवीन राजकीय समीकरण उदयास येऊ शकते. रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत, परंतु लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या पराभवामुळे आता संतोष दानवे यांची वाट खडतर आहे.
रावसाहेब दानवे यांच्या पराभवामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कल्याण काळे यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघातून 862 मतांनी आघाडी घेतल्याने महाविकास आघाडीचे (मविआ) मनोबल उंचावले आहे. यामुळे मविआच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.

संतोष दानवे यांची वाटचाल
रावसाहेब दानवे यांनी 1990 आणि 1995 मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2014 आणि 2019 मध्ये त्यांचे पुत्र संतोष दानवे यांना या मतदारसंघातून विजय मिळाला. परंतु, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे संतोष दानवे यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक ठरणार आहे.
भोकरदनमधील भाजपचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष
1999 मध्ये भाजपचे विठ्ठलराव सपकाळ भोकरदनमधून निवडून आले होते, परंतु त्यांचे निधन झाल्यामुळे 2003 मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले चंद्रकांत दानवे विजयी झाले. त्यांनी 2004 आणि 2009 मध्येही विजय मिळवला. पुढे 2014 आणि २2019 मध्ये चंद्रकांत दानवे यांचा पराभव झाला, आणि दोन्हीवेळा त्यांचा पराभव संतोष दानवे यांनी केला.
2014 मध्ये 6,750 मतांनी आणि 2019 मध्ये 32,490 मतांनी त्यांचा विजय झाला होता. परंतु यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी आघाडी घेतल्याने मविआच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे, आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतून इच्छुक उमेदवार
भोकरदनमधून मविआच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची तयारी करणारे अनेक उमेदवार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख प्रबळ दावेदार आहेत. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे इच्छुक आहेत. या परिस्थितीत, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात चंद्रकांत दानवे आणि सुरेखा लहाने असे दोन गट आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच हे दोन गट विधानसभा मतदार संघात आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आमने सामने आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची
मागील वर्षभरात मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला. आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार यावर भोकरदन मतदारसंघात राजकीय पक्ष आपली रणनीती आखणार आहेत.
या आहेत समस्या
आमदार संतोष दानवे यांनी 10 वर्षांत अनेक विकासकामे केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. पण, अजूनही अनेक गावांमध्ये रस्ते, पाणी या समस्या असल्याचे सांगितले जात आहे. बेरोजगारी, शेतमालाला कमी भाव हीसुद्धा समस्या आहे.












Click it and Unblock the Notifications